अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गुजरात दौरे आणि सभा सुरूच असून त्यांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
गुजरातमध्ये यावेळी आम्ही भाजपला जेरीस आणले आहे असा दावा करतानाच भाजपवर विश्वास ठेवू नका, कारण निवडणूक जिंकल्यानंतर तेच तुम्हाला काठ्या मारतील असे त्यांनी गुजरातच्या जनतेला उद्देशून म्हटले आहे.
केजरीवाला म्हणाले की भाजपचे नेते तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलवत आहेत. मात्र आता ते तुम्हाला जे देतील ते घ्या. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही सरकार बदलण्याचेच फक्त काम करा. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही निशाना साधला. कॉंग्रेसला जर मतदान केले तर राहुल गांधी यांची प्रगती होईल आणि भाजपला मत दिले तर अमित शहा यांच्या मुलाची प्रगती होईल.
जर आम आदमी पक्षाला मत दिले तर गुजरातमधील प्रत्येक मुलाची प्रगती होईल असे ते म्हणाले. तुम्ही आतापर्यंत पर्याय नाही म्हणून भाजपला मतदान करत होते कारण कॉंग्रेस त्यांच्यापेक्षा वाईट होती. मात्र आता तसे करण्याची गरज नाही कारण आम आदमी पक्षाच्या रूपात तुम्हाला चांगला पर्याय आता उपलब्ध आहे.