मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारत त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप ठाकरे गट आणि स्वत: सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
याविषयी बोलताना,“काल माझी सभा नाकारण्याचं कारण मला शेवटपर्यंत कळलं नाही. कारण माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कुणाचा तक्रार अर्जही आलेला नव्हता. फक्त मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार झाला. सभेची वेळ संपेपर्यंत मी हॉटेलमधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली. मी कदाचित जोरजबरदस्ती करून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करू शकले असते. पण त्यामुळे भाजपाला किंवा गुलाबराव पाटलांना जे अपेक्षित होतं की यातून गोंधळ व्हावा, ते मला टाळायचं होतं. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नव्हतं. आपण कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. मी मग हॉटेलमधूनच ऑनलाईन सभा घेतली”, असे सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून अडथळे आणले गेले, तरी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करणारच, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. “असं सगळं करून मी घाबरेन, असं काही पुढे करणार नाही असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. बाई समजून हलक्यात घेऊन नका. मी लढणार आहे. मी महिला म्हणून अजिबात व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवणार आहे”, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
पुढे बोलताना अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचादेखील समाचार घेतला. “गुलाबराव पाटील गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे कसं करतील? देवेंद्र फडणवीसांना या सगळ्याची कल्पना नसेल का? तुम्ही चिथावणीखोर वक्तव्य म्हणता. प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात, सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात. संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, नारायण राणे एकेरीने भाष्य करतात, संतोष बांगरांनी पोलिसांना केलेली शिवीगाळ हे सगळं चिथावणीखोर नाही का? पण या सगळ्यापैकी एकावरही काहीच कारवाई केली जात नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.