नवी दिल्ली – हॉलमार्किंगच्या निर्णयाची अयोग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप करून देशातील दागिने उत्पादकांनी सोमवारी एक दिवसाचा संप करण्याचे जाहीर केले आहे. मात्र हॉलमार्किंगच्या निर्णयाची यशस्वीपणे आतापर्यंत अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे दागिने उत्पादकांनी संप करू नये असे सरकारने दागिने उत्पादकांना आवाहन केले आहे.
गेल्या 50 दिवसांपासून देशभरात हॉलमार्किंगच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात दागिने उत्पादक यासाठी नोंदणी करीत आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे दागिने उत्पादकांनी संप करण्याची गरज नाही असे सरकारला वाटते. संपूर्ण देशात एकाच वेळी हॉलमार्किंगची अंमलबजावणी करता येणे शक्य नसल्याची बाब ध्यानात घेऊन सरकारने टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
16 जून रोजी देशातील 28 राज्यातील 256 जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. 16जून आगोदर देशभरातील दागिने उत्पादकांना हॉलमार्किग करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भात ब्युरो ऑफ इंडियन स्टैंडर्ड या संस्थेचे संचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सांगितले की, उत्पादकांच्या प्रत्येक मागणीकडे लक्ष देऊन त्या मागण्या पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे दागिने उत्पादकांनी संप करण्याची गरज काय असे मला वाटते.
या अगोदर 19 ऑगस्ट रोजी या विषयावर बैठक झाली होती. त्या वेळी बऱ्याच छोट्या दागिने उत्पादकांनी हॉलमार्किंगच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आमचा ब्रॅंड विकसित होण्यास मदत होत आहे असे दागिने उत्पादकांनी सांगितले होते. उत्पादकाच्या प्रत्येक मागणीवर काळजीपूर्वक विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असताना या संपामुळे परिस्थिती बिघडेल असे त्यांनी सांगितले.
ग्राहक, दागिने उत्पादक यांचे हितसंबंध जपले जावे त्याचबरोबर भारतातून दागिन्यांची निर्यात वाढावी यासाठी या व्यवसायाचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
काल दागिने उत्पादकाच्या परिषदेने संप जाहीर केला. हॉलमार्किंगसाठी पुरेशी केंद्र नाहीत. त्याचबरोबर हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या शुद्धतेची शाश्वती मिळत नाही. केवळ दागिने उत्पादकांचा पाठलाग करण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात येत आहे असे दागिने उत्पादकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर देशात निर्माण होणाऱ्या दागिन्याची संख्या पाहता त्यासाठी पुरेशी हॉल मार्किंग केंद्रे नाहीत. त्यामुळे दागिने उत्पादकाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दागिने उत्पादकांनी सांगितले.