Sanjay Raut : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून, मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही ट्विट करत ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यासोबतच राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, ‘कुठून तरी आलेली स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात कधी हिंदू असतात कधी मराठी असतात काहीतरी ठरवा. सुधाकरासारखा एकच प्याला मधलं बोलू नका, असा टोला मनसेला लगावला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
बेळगावात मराठी भाषेवर इतका अत्याचार होतं असताना भाजपच्या लोकांनी तोंड वर केलं आहे का. हिंदीला घटनात्मक वैधता नसली तरीही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. त्यांची सोय करु नका. हे बरोबर नाही. या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, नाटक यांचा उगम झाला आहे. जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तेवढी हिम्मत तुमच्यात आहे का?
‘केंद्र सरकारची हिंदी प्रचार समिती आहे. लोकांना हिंदीविषयी प्रेम आहे कारण ती संवाद भाषा आहे. ती तुम्ही अभ्यासक्रमात लादू नका. हिंदी यायला पाहिजे, पण अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका. महाराष्ट्रात सर्वात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मग इंटरनॅशनल असो किवा सीबीएसई मराठी सक्तीची केली पाहिजे. तेवढी हिम्मत तुमच्यात आहे का? ते करावं आधी. नोकरी मिळवण्यासाठी मराठी सक्तीची केली? का ते करावं आणि मग इतर भाषांबाबतीत सक्ती करावी, असं संजय राऊत म्हणाले.
आम्हाला हिंदी शिकवू नका गुजरातला शिकवा
‘कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो. मग त्या पक्षाच्या वतीने कोणीतरी जावून शिवाजी पार्कवर जाऊन नेत्यांशी चर्चा करतात. दुसऱ्या दिवशी इतकं मोठं एक मराठीत ट्विट येतंय बहुतेक ते कुठल्यातरी सागर बंगल्यावरून ते ट्विट तयार करून आलं होतं. इतकी तत्परता असू शकते का? मराठी विषयी प्रेम आहे आम्हाला. पण ते लादू नका. विद्यार्थ्यांवर ओझ लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका गुजरातला शिकवा,’ असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.
काय म्हणले होते राज ठाकरे?
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? असं राज ठाकरे यांनी म्हटले होते.