माळीणचे स्मृतिस्थळ “सेल्फी पॉइंट’ नाही ः हौशी पर्यटकांना सूचना
आंबेगाव – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम डोंगराळ भागात माळीण हे गाव 30 जुलै 2014 ला पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराची एक दरड गावावर कोसळली आणि त्या खाली गाडले गेले. या दुर्घटनेत 151 जणांना प्राण गमवावे लागले.
74 पैकी 44 घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. या घटनेला सात वर्षे उलटून गेली; शासनाने गावचे पुनर्वसन केले आणि या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मृती जागवण्याच्या हेतूने एक स्मृतिस्थळ बांधण्यात आले आहे; परंतु येणारे पर्यटक या ठिकाणाला सेल्फी पॉइंट समजून सेल्फी काढतात, त्यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून समजते.
जुन्या गावजवळच नवीन माळीण गावचे पुनर्वसन झाले. जुन्या माळीण गावात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी एक स्मृतिस्थळ बांधण्यात आले. येथे भेट देणारे अनेक संवेदनशील पर्यटक या ठिकाणी येऊन मृतात्म्यास आदरांजली समर्पित करतात. मात्र, अनेक हौशी पर्यटकांनी या स्मृतीस्थळाचे सेल्फी पॉइंट केल्यामुळे या ठिकाणाचे महत्त्वच बदलून गेले आहे किंवा त्याच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे.
अशा काही कारणामुळे या स्मृतीस्थळाची विटंबना होत असून पर्यटकांनी स्थानिकांच्या भावना आणि वेदनांशी खेळू नये असे भावनिक आवाहन आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.