सीईओ यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना
पुणे – करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये गर्दी होईल, अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत सीईओ यांनी गटविकास अधिकारी यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये या सूचना दिल्या. करोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने शासकीय कार्यालयीन यंत्रणांनी कोणतीही गर्दी निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पंचायत समिती पातळीवर सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रम, एकाच वेळी गर्दी होईल असा सभा, बैठका, मेळावे, यात्रा, उत्सव, समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
करोनाबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी, संसर्ग टाळण्यासाठी कार्यालयात वारंवार हात स्वच्छ करणे, सॅनीटायझर, साबणांचा वापर करणे, आजाराबाबत चुकीची माहिती सोशल मीडियात प्रसिद्ध होणार नाही याची दक्षता घेणे आदी सूचना ग्रामपंचायत कार्यालयांना देण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत.
करोनाबाधित भाग नियंत्रित क्षेत्र
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना करण्यात येत असून, करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असल्यास, बाधित जागेपासून तीन किलोमीटरचे क्षेत्र नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तर बाधित ग्रामपंचायतीच्या नियंत्रण क्षेत्रानंतर 2 किलोमीटरचे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित केले जाणार आहे. या क्षेत्रामध्ये आवश्यक तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. बाधित ग्रामपंचायतीमध्ये आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ल्याने विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक मालमत्तांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी दिल्या आहेत.