मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर सर्वत्र निर्बंध लादण्यात आले होते. त्यात मुंबई आणि पुण्याचा मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुण्यात तातडीने निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील गर्दीवर चिंता व्यक्त करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना इशारा दिला आहे.
पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका.
लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण करोना संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,” असे आवाहन अजित पवार यांनी केले.
“पेट्रोल-डिझेलचे दर १०० रूपयांच्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे कर कमी करण्याची मागणी होत आहे, परंतु गेल्या वर्षांपासून आपण करोनाशी लढत आहोत. त्यामुळे करामध्ये कपात करता येणार नाही. केंद्राची परिस्थिती आता चांगली आहे,” असे सांगत त्यांनी पेट्रोलवर दर कपातीचा निर्णय केंद्राकडे टोलावला.
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी. आगामी महापालिकेत प्रभाग २, ३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, “सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.