पुणे – करोनाशी मुकाबला करत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कोणत्याही स्थितीत कामे रेंगाळू देऊ नका, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला. चाकण, राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते.तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्ववते. तेथील रुंदीकरणाचे काम करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
सातारा मार्गावरील खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे. सातारा जिल्ह्यातील मार्गांसह टेंभुर्णी-पंढरपूर -मंगळवेढा-उमदी-विजापूर आणि अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे. भूसंपादनातील त्रुटी दूर करा,मिळालेला निधी खर्च करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.