पुणे -महाराष्ट्रात कुस्ती हा महत्वाचा खेळ आहे. कुस्तीच्या खेळात कोणी राजकारण आणू नये. जाती-पाती, धर्माचे लेबल लावून कोणी कुस्तीला बदनाम करु नका, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हिंद केसरी पै. अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उप महाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांचा बुलेट व सन्मानचिन्हाने अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार कुमार गोसावी, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, दीपक मानकर, दिपक पोकळे, रवींद्र माळवदकर, प्रदीप गारटकर, पंढरीनाथ पठारे, किशोर कांबळे, वस्ताद गोविंद पवार आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोयता गॅंगला जेरबंद करण्याची कामगिरी करणाऱ्या अक्षय इंगवले, धनंजय पाटील या पोलींसानाही सन्मानित करण्यात आले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती या खेळाला राजमान्यता दिली. महाराष्ट्राची शान म्हणून कुस्तीची ओळख आहे. मल्लांना पुढे जाण्यासाठी सतत अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणी कुणा पेक्षा भारी असे म्हणून चालणार नाही. कोणाचेही नाव घेऊन द्वेषाचे राजकारण चालणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ज्यांना लंगोटही बांधता येत नाही, ते सुद्धा आता कुस्तीच्या आखाड्यात उतरू लागले आहेत. यामुळे कुस्तीच्या चर्चेचा धुराळा खूप उडाला. ज्यांना कुस्तीच्या मातीचा धुराळा, आखाडा नीट माहिती आहे, त्याची कुस्तीविषयी अधिकाराने बोलायला पाहिजे, असे म्हणत पवार यांनी काही जणांना टोलाही लगावला आहे.
यश-अपयश खेळाचा भाग
खेळात यश-अपयश येतच असते. यशामुळे फार कोणी हरळून जाता कामा नये व अपयशाने नाउमेद होऊन चालणार नाही. नेहमी जमिनीवरच पाय ठेवून वागावे, असा सल्लाही त्यांनी मल्लांना दिला. महाराष्ट्रातील मल्लांनी सतत चांगली कामगिरी करत ऑलिम्पिकमध्येही महाराष्ट्राचे नाव उज्वल करायला हवे. आपल्या राष्ट्रगीताची धून तिथे ऐकायला मिळायला हवी आहे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.