नवी दिल्ली – शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ऐकीव माहितीवर किंवा अफवावर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नये. त्याचबरोबर नोंदलेल्या खात्रीशीर ब्रोकरच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी असा सल्ला बाजार नियंत्रक सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांनी दिला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली आहे. कंपन्यांचे बाजार मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिमॅट खात्याची आणि ट्रेडिंग खात्याची संख्या वाढत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. काही विघातक शक्ती गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे त्यागी म्हणाले.
गुंतवणूकदारांनी अगोदर सर्व बाबीची योग्य शहानिशा केल्यानंतरच गुंतवणूक करणे अपेक्षित असते. त्यासाठी योग्य ब्रोकर निवडावा लागतो. त्याचबरोबर सर्व बाबीची आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. सेबी आपल्या परीने गुंतवणूकदारांची वित्तीय साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यासाठी दरवर्षी गुंतवणुकदार आठवडा साजरा केला जातो. या काळामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसंदर्भातील माहिती दिली जाते. हा कार्यक्रम 22 नोव्हेंबरला सुरू झाला असून 28 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.
जे व्यवस्थित गृहपाठ करून गुंतवणूक करतात तेच खरे गुंतवणूकदार असतात. गुंतवणूकदारांना गुंतवणूक सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने करता यावी याकरिता शेअर बाजार निरंतर प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांच्या तक्रारींच्या निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांना काही अडचणी असल्यास या यंत्रणेचा गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.