आंबेगाव परिसरात दुकानदारांकडून निर्बंध, नियम मोडीत
आंबेगाव (प्रतिनिधी) – लॉकडाऊन निर्बंधामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे. परंतु, ठराविक वेळेत दुकाने सुरू असताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वत्र मोडला जात आहे. गेल्यावर्षी लॅकडाऊनमध्ये दुकानदार ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी आग्रह करीत होते. आता, 7 ते 11 अशी ठराविक वेळ असल्याने त्यात धंदा करण्याच्या गडबडीत दुकानदार दिसतात, तर सुरक्षिततेसाठी आखण्यात आलेले पट्टे, चौकोनी बॉक्स, गोलही आता गायब झाले आहेत.
लॉकडाऊन निर्बंधाच्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असल्याने सकाळी 7 ते 11 या वेळेत बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. या वेळेत अधिकाधिक धंदा करण्याच्या प्रयत्नात सुरक्षिततेच्या नियमांचा विसरच दुकानदार; तसेच ग्राहकांना पडला आहे. काही दुकानदार तर 11 नंतरही दुकाने उघडी ठेवत आहेत. सोशल डिस्टन्सिंगसाठी ठराविक अंतरावर तयार करण्यात आलेले दुकानांपुढील चौकोन, गोल आता पुसले गेले आहेत. रुमाल अथवा मास्कने चेहरा झाकणारे ग्राहक सोशल डिस्टन्स विसरले आहेत.
पोलिसांचा बंदोबस्त असला तरी काही दुकानदार मनमानी पद्धतीने वावरत आहेत. शनिवार, रविवार या वीकेंडच्या दिवशी पूर्ण बंदचा नियम असतानाही दुकानांचे शटर अर्धे ठेवून ग्राहकांना माल दिला जात आहे.
दुकानात खरेदी करताना एकच व्यक्ती काउंटरवर असावी, असा नियम असताना दोन ते चार ग्राहक शेजारी शेजारी उभे असल्याचे सर्रास दिसते. एका वेळी एक किंवा दोनच ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जाईल, हा नियम आता फक्त पाटीवरच दिसत आहे.
भाजीपाला, फळविक्रेत्यांकडून तर सर्वच नियम मोडीत काढून धंदा सुरू आहे, मिळेल त्या ठिकाणी हे विक्रेत पूर्वीप्रमाणे उभे असतात. रस्त्यावर मनमानी पद्धतीने लावलेली वाहने, भाजीपाल्याचे टेम्पो यातून करोनाबाधित वाढण्याचा धोका अधिक आहे.