आंबेगाव बुद्रुक – पुणे शहर तसेच उपनगरांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंधासह शनिवार आणि रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानंतरही नागरिक किरकोळ कारणांतून विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने घरी बसा… बाहेर पडू नका… असे सांगून पोलिसांचे घसेही कोरडे पडू लागले आहेत. यावर आता पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा पर्याय अवलंबला आहे. यानुसार दत्तनगर चौकात कारवाई केली जात असून अनेकांकडून रितसर दंडाच्या “पावत्या’ फाडण्यात आल्या असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.
आंबेगाव परिसरात करोना रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नाही. अशा स्थितीतही नागरिक घराबाहेर पडत आहेत. सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असताना 11 नंतर तसेच संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच समाधानकारक उत्तर न देणाऱ्या नागरिकांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दत्तनगर चौकात चेकनाका उभारण्यात आला असून दिवसभर खडा पहारा आहे. निर्धारित वेळेनंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीस कडक करवाई करीत असून आज दिवसभरात अशा 40 हिंडफिऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली, असल्याचे जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस शिपाई दत्तात्रय खपाले, महिला पोलीस स्वाती शिंदे, शिपाई सोनाली शेडगे, पोलीस हवालदार कृष्णा बढे, अमित शेडगे, चेतन चोरगे, सहाय्यक फौजदार सुधीर गायकवाड, पूजा खवले, विशेष पोलीस अधिकारी गजेंद्र पाटील आणि त्यांचे पथक सदर कारवाई करीत आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आरोग्य व पोलीस यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण आहे. शहर करोना मुक्त करण्यासाठी नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहेत. परंतु, नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.
– आशिष कवठेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक, दत्तनगर पोलीस स्टेशन