मुंबई: अरबी समुद्रामध्ये ‘महा’ चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.
महा चक्रीवादळ 5 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ते हळूहळू अशक्त होईल. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल.
पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महा चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.