पिंपरी – करोनाकाळात देशात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना रुजली. बहुतेक सर्वच लहान-मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, डेस्कटॉप देऊन घरुनच काम करण्याची मुभा दिली. घरुनच काम करण्याच्या या संकल्पेनेने कर्मचारी सुखावले होते. कंपनीने दिलेला संगणकही प्रिय वाटत होता. परंतु आता तोच संगणक कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. करोना आटोक्यात आल्यानंतर कार्यालये सुरू झाली आहेत, परंतु वर्क फ्रॉम होम पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
करोनाबाबतचे निर्बंध हटल्यानंतर बहुतेक सर्व कंपन्यांची कार्यालये सुरू झाली असून कर्मचारी कामावर जाऊ लागले आहेत. असे असतानाही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले संगणक अद्याप परत घेतले नाहीत. आता हेच संगणक कर्मचाऱ्यांकडून कार्यालयासोबत घरुनही काम करुन घेत आहेत. सुट्टीच्या दिवशीही थोडा वेळ का होईना काम करण्याचा अप्रत्यक्षपणे आग्रह केला जात आहे. यामुळे अनेकांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू राहते काम
कर्मचाऱ्यांनी घरीही काम करावे, यासाठी वरिष्ठांना वेगवेगळ्या युक्त्या लढवाव्या लागतात. त्यात प्रामुख्याने हातातील काम संपेपर्यंत वाट पाहणे आणि दुपारनंतर अतिरिक्त काम टाकून हे आजच्या आज पूर्ण करणे गरजेचे असल्याचा मेल करणे. नाइलाजास्तव घरी गेल्यावर जेवल्यानंतरही कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उघडून बसावे लागते. विमा क्षेत्रातील एका बड्या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले की रात्री उशिरापर्यंत कंपनीच्या साइटवर चॅटबॉक्स, ई-मेल सुरू असतात. काम पूर्ण झाले की नाही याचा वरिष्ठांकडून आढावा घेतला जातो.
कामाचा कालावधी आणि सुट्टी
कामाचे नियोजन करताना अशा पद्धतीने केले जाते की संबंधित प्रोजेक्ट, केसेस पूर्ण करण्याचा कालावधी खूपच विचारपूर्वक केला जातो. उदाहरणार्थ बहुतेक प्रोजेक्ट किंवा केसेस पूर्ण करुन सोमवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी सबमिट करण्याच्या सूचना दिल्या जातात. या सूचना एक-दोन दिवसांआधी दिल्या जात असल्याने शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करावे लागते, असे एका अधिकाऱ्यांने दैनिक “प्रभात’ शी बोलताना सांगितले.
कामाचा वाढता ताण
करोनाकाळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना गावी गेल्यामुळे नाइलाजास्तव नोकऱ्या सोडाव्या लागल्या. यामुळे मनुष्यबळ कमी झाले. करोनानंतर मंदीचे सावट येण्याचे भाकित वर्तविले जात होते. यामुळे आयटी कंपन्यां सोडता इतर क्षेत्रातील कंपन्यांनी पुरेशा प्रमाणात भरती केली नाही. परंतु भाकितांच्या उलट भारतात मात्र अनेक क्षेत्रांमधील काम वाढले. उपलब्ध मनुष्यबळातच अतिरिक्त काम करुन घ्यायचा अघोषित निर्णय झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण दिसून येत आहे.
———————