वेल्हे – शिक्षक आम्हाला हवे आहेत… आम्हांला चांगला शिक्षक द्या… आमचा शिकण्याचा हक्क हिरावू नका… अशा घोषणा देत देवपाल (ता. वेल्हे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वेल्हे पंचायत समितीसमोर सोमवारी (दि. 13) ठिय्या आंदोलन केले.
स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली देवपाल शाळा. या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरत असून सध्या या शाळेत 53 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची 4 पदे मंजूर असून 2 पदे रिक्त आहेत. सध्या 2 शिक्षक फक्त पटावर कार्यरत असून प्रत्यक्षात मात्र एकाच शिक्षकावर ही शाळा चालत असल्याचे भयानक वास्तव विद्यार्थ्यांनी कथन केले आहे.
ऐतिहासिक बारागाव मावळ भागातील या शाळेत सणसवाडी, देवपाल, मेटपिलावरे व वडेवस्ती या वाड्या वस्त्यांवरून रोज पायपीट करीत नवीन काहीतरी शिकायला मिळेल, या आशेने विद्यार्थी शाळेत येतात. परंतू दौंडमधून निलंबित केलेल्या शिक्षकाला शिक्षा म्हणून या शाळेत टाकले आहे. वारंवार गैरहजर राहणे, उशिरा शाळेत येतात असे येथील विद्यार्थी सांगत आहेत. विनोद पांडुरंग कदम या शिक्षकाच्या विरोधात 8 वेळा अर्ज करूनही प्रशासनाने विद्यार्थ्यांना अद्याप न्याय मिळवून दिला नाही.
या शाळेत 53 विद्यार्थी शिकत असून विनोद कदम नावाचे शिक्षक वारंवार गैरहजर असतात. फक्त मुधळे सर एकटेच शाळेवर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन आलो आहोत. लवकरात लवकर शिक्षक मिळावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल.
– राजू खुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष.
शिक्षक उपलब्ध करा; अन्यथा शाळेला टाळे ठोकू
सध्या एकाच शिक्षकाला सर्व वर्गाचे अध्यापन, नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, सर्व प्रशासकीय कामे करताना प्रचंड मनस्ताप होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंचायत समितीकडून आठ दिवसांत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.