लखनौ – देशातल्या अन्य राज्यांप्रमाणेच सध्या उत्तरप्रदेशात प्रचंड वीज टंचाई निर्माण झाली आहे. या संबंधात उपाययोजना करण्याऐवजी त्याची कारणमिमांसा करण्यात हे सरकार व्यस्त आहे. सरकारने आम्हाला कारणे सांगू नये तर त्वरीत वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.
त्यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री ए के शर्मा यांनी दिलेल्या माहितीचा उतारा ट्विटवर पोस्ट केला आहे, ज्यात तांत्रिक कारणांमुळे काही वीज निर्मिती युनिट्स बंद झाल्याचे कारण उर्जा मंत्र्यांनी दिले आहे. हा संदर्भ देत अखिलेश यांनी म्हटले आहे की, सरकारचे काम एखाद्या समस्येचे कारण सांगणे नाही तर ते सोडवणे हे आहे”.
अखिलेश यांनी म्हटले आहे की , पूर्वांचलपासून पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत सर्व भागातील लोक वीज टंचाईने त्रस्त आहेत आणि पारा चढल्याने विजेचे संकट अधिक गडद होत आहे. उत्तरप्रदेशच्या उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये विजेची मागणी सुमारे 22,000 मेगावॅट इतकी आहे तर उपलब्धता सुमारे 19,000 मेगावॅट आहे, त्यामुळे गावे आणि शहरांमध्ये सर्रास भारनियमन सुरू आहे.