पुणे – करोनामुळे जागतिक स्तरावर खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. नोकरदार असो, उद्योगपती असो प्रत्येकजण अडचणीत आहे. अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडलेले आहेत. तसेच बऱ्याच जणांनी नोकरी गमावली आहे. त्यामुळे खूपच निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती कायम राहणार नाही, खचून जाऊ नका, एक-दोन महिन्यात परिस्थिती नक्कीच बदलेल, असे मत मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष व प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमद्वारा आयोजित “लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती व नैराश्य’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित वेबिनारमध्ये जाधव बोलत होते. मिहिर टुरिझम पुणेचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर करंदीकर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या डॉ. सुजाता शेणई, औद्योगिक सल्लागार वंदन नगरकर, समुपदेशिका धनश्री घारे उपस्थित होते. या वेबिनारमध्ये 127 उद्योजक सहभागी झाले होते.
सुधीर करंदीकर म्हणाले की, करोना हे एक नैसर्गिक संकट आहे. या काळात एकमेकांशी संवाद साधा, मन शांत ठेवा, उद्योग बदलण्याचा विचार करू नका. प्रा. धनश्री घारे म्हणाल्या, निराशा ही मनस्थितीवर परिणाम करते, मनस्थिती चांगली असेल तर आपण आनंदी असतो. या काळात काम नसेल तर नवीन कौशल्य शिका. मूळ व्यवसायात बदल न करता समांतर व्यवसायाचा विचार करा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्लार यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य रमेश पंडित यांनी आभार मानले.