मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज ते आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.
आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही करोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे. मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरू झाले आहे, त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांने मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला होता. हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेलांमध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल, मॉल, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे कोणालाही आवडणार नाही. आपण हे अर्थचक्र सुरू केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.