कोल्हापूर – शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य हमीभाव मिळत नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रयाग चिखली ते नरसिंह वाडी या मार्गावर शेतकरी संघर्ष यात्रा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना आतंकवादी होण्यास भाग पाडू नये. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने ठोस असा निर्णय घ्यावा. या मागणीसाठी 1 सप्टेंबरपासून शेतकरी संघर्ष यात्रेची सुरुवात करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या ठिकाणापासून होणार आहे. या यात्रेचे नियोजन पाच दिवस असणार आहे. निगवे, भुये, शिये, शिरोली हलोंडी, चिंचवाड, पट्टणकोडोली, इंगळे, इचलकरंजी अब्दुल लाट, हेरवाड, तेरवाड मार्गे ही यात्रा नरसिंह वाडी येथे कृष्णा नदीच्या काठावर पोहोचणार आहे.
या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी होणार असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृष्णा नदीत जलसमाधी घेणार असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.
या यात्रेदरम्यान पोलिसांनी अद्याप कोणत्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र पोलीस आले तरी आम्ही ही यात्रा काढणारच. कारण शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. केंद्र किंवा राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी कोणतच गांभीर्य नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान दिलेले नाही. हे अनुदान गेले कुठे? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केला आहे.
विविध कृषी योजनांच्या पोकळ घोषणा करण्यापेक्षा आवश्यक त्या योजना राबवाव्यात. कृषिमंत्र्यांनी सांगावे कागदावर असणाऱ्या किती योजना आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत? असे राजू शेट्टी म्हणाले.