मसूर – भाजपच्या भूलथापांना बळी न पडता पदवीधर आणि शिक्षकांनी महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार राजेश प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा आणि मूळ विषय बाजूला ठेऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, युवक कॉंग्रेसचे शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ . सुरेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक आमदारकीसाठी ही निवडणूक वेगळी आहे. मतदारसंघही मोठा आहे. त्यामुळे उमदेवारांना सर्वच ठिकाणी पोचणे शक्य होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत न्यावे. भाजपकडून दिशाभूल करणाऱ्या वल्गना केल्या जात आहे. त्याला बळी पडू नये.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधक वारंवार सरकारच्या विरोधात भाष्य करत आहेत, परंतु त्याकडे लक्ष न देता महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, पदवीधर व शिक्षक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जयसिंगराव जाधव, भीमराव ढमाले, वैशाली जाधव, राजाभाऊ उंडाळकर, नंदकुमार बटाने, मनोहर शिंदे, ऍड. रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराज पाटील यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राजेश पाटील वाठारकर , रवींद्र पवार, आनंदराव पाटील, नंदकुमार बटाणे, अजित पाटील-चिखलीकर, रामभाऊ रैनाक, नितीन काशीद उपस्थित होते.
समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय
समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या पुणे पदवीधर मतदार संघ व पुणे शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.