उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन
पुणे – देशातील पहिले करोना बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला करोनामुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतीलच परंतु जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
होळीला करोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला करोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, असा विश्वास देतांनाच उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये, नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, त्याचबरोबर बाहेरून घरात आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ घुवून घेण्यात यावेत.असे आवाहन केलं आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पाच ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थाबावे, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
अमेरिकेने लॉकडाऊन केले तरी नागरिक घराबाहेर फिरत होते त्यामुळे अखेर या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं व त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
अजित पवार यांच्या आवाहनातील इतर मुद्दे
– देशातील पहिले दोन रुग्ण करोनामुक्त झाल्याचा आनंद
– करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन
– संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार
– जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार व साठा केल्यास कारवाई
– करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या चितांजनक
– नागरिकांनी गांभीर्य ओळखून स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी
– जीवनावश्यक वस्तूचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही
– नागरिकांनी दुकानात खरेदी करतानासुद्धा अंतर ठेवावे