खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर; पिचलेल्या बळीराजाला आधार देणे गरजेचे
अधिकाऱ्यांचा हेकेखोरपणा
शेतात पाणी साचलेले असेल तरच नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरेल, असा निकष पंचनामा करताना अधिकाऱ्यांकडून लावला जात असल्याचे आ. गोरेंनी प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पाण्यामुळे पिके कुजली आहेत. पुढील पेरण्या झालेल्या नाहीत. हे नुकसान मोठे असल्याने सरसकट पंचनामे करावेत, अशी अपेक्षा गोरे यांनी व्यक्त केली. आज दुसऱ्या दिवशीही कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने खासदारांनी नाराजी व्यक्त केली.
सातारा – खटाव, माण या तालुक्यांसह दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून मेटाकुटीला आला आहे. आता अतिवृष्टीने त्यांचे कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. एकाही शेतकऱ्याला वगळू नये, अशा सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या.
माण तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये पाहणी करताना ते बोलत होते. आ. जयकुमार गोरे, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे उपस्थित होते.
खा. निंबाळकर म्हणाले, या भागातील शेतकरी आधीच दुष्काळाने हैराण झाला आहे. आता यावर्षी अतिवृष्टीमुळे बळीराजासमोर मोठे संकट उभे आहे. खरिपाची पिके शेतात कुजून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने रब्बीच्या पेरण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच न लागल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे सरसकट करा. एकाही शेतकऱ्याला वगळू नका. आ. गोरे म्हणाले, शेतकऱ्यांची अवस्था मी गेल्या दोन दिवसात पाहिली आहे. बळीराजाला मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.