पंढरपूर : आज कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे असे विठुरायाला साकडे घातले. तसेच त्यांनी गोर गरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नाव देखील नको असे म्हणत लॉकडाऊनला आपला विरोध दर्शवला आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत संकेत देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ‘गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको’ अशा शब्दात त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केले तर त्यांचे घर चालते अशांना लॉकडाऊनचा फटका बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केले तेव्हा हा सर्व समाज निमूटपणे आदेश पाळत आलाय, असे सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊयात असे अजित पवार म्हणाले..
दरम्यान,श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळ पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.
आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, तुम्ही कधी आषाढीची पूजा करणार? असं विचारलं असता पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे अशा शब्दात अजित पवारांनी सध्या तरी उपमुख्यमंत्रीपदावरच समाधानी असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदाय समंजस असून काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांचा पाठिंबा नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला.