शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा घेतला आढावा
पुणे – शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कर्ज माफीची यादी देताना जिल्हा बॅंकांनी पात्र शेतकऱ्यांचीच यादी द्यावी. कर्जमाफीच्या यादीमध्ये अपात्र व्यक्तींचे नाव आल्यास अथवा चुकीचे काम केल्यास बॅंकेच्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा परखड इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी या सूचना दिला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांबद्दल शासन संवेदनशील आहे. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी कर्जमाफी योजनेमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर या योजनेचा आढावा घ्यावा. आपण सर्वजण मिळून चांगले काम करू.
कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा सहकारी बॅंकांनी यादी नीट करावी. कर्जमाफीच्या यादीमध्ये अपात्र व्यक्तींची नावे घुसवू नये. असे प्रकार केल्यास त्या बॅंक अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोणतेही गैरप्रकार होता कामा नये, असेही पवार यांनी सांगितले.