पुणे : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वांरवार शाब्दिक युद्ध होताना पहायला मिळत आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच आपल्या कार्यकर्त्यांसह नगरसेवकांना कामाची रुपरेषा समजावुन सांगितले. मात्र, हे सांगत असताना त्यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामं करा. काही कामं राहात असतात मात्र, ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखं करु नका. निवडणुकीआधी आश्वासन द्यायचं आणि पुन्हा विसरायचं. युनिटपर्यंत वीज मोफत देऊ म्हणणाऱ्या शिवसेनेने करोना काळात अवाढव्य वीजबिलं दिली, शिवाय वाहून गेलेल्या घराला अडीच हजारांचं वीजबिल दिलं.अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला.
पुण्यातील एका विकास कामाच्या उद्घाटन समारंभात पाटील बोलत होते. भाजपा नगरसेवकांना सल्ला देताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. पुण्यातील उद्घाटन समारंभात शिवसेनेवर हल्लाबोल करताना पाटील म्हणाले की, शिवसेनेने निवडणुकीआधी युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं अश्वासन दिलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं नाही. करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं विज बिल आलं. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो.
भाजपा नगरसेवकांना सल्ला देताना पाटील म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करावा. जनतेला दिलेल्या अश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी तयार करायला हवी. आपली कोणती कामे राहीली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील. असा सल्ला दिला.