शिरुर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठे राजकारण सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता आपले गाव सांभाळावे, विनाकारण शिरूर शहरात येऊन पाटीलकी करू नका, असा मोलाचा सल्ला देताना कार्यकर्त्यांना चिमटाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काढला.शिवसेनेचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करा, बारामती तालुक्यात केलेला दौरा राजकारण नसून कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून तेथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिरुर तालुका शिवसेना व पदाधिकाऱ्यांची बैठक साई गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खटके, तालुका प्रमुख सुधीर फराटे, आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार, पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, श्रद्धा कदम, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, अनिल काशिद, शहरप्रमुख मयूर थोरात, माजी शहरप्रमुख नगरसेवक संजय देशमुख, विजया टेमगिरे, शैलजा दुर्गे, पोपटराव निंबाळकर आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 10 हजार कोटींची मदत शासनाने जाहिर केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना मदतीचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
राज्य शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. तालुक्यातील गटबाजीवर आढळराव यांनी कडाडून टीका केली. एखादा पदाधिकारी चूकत असेल तर नेत्यांना सांगा. सामोपचाराने त्यावर मार्ग काढू व चुकीचे वागेल त्याला जाब विचारु. प्रथम संघटना वाढीसाठी प्रयत्न करा. आधी संघटना मोठी करा, गटबाजीत गुंतू नका पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना म्हणजे अंगावर पाल पडल्यासारखे वाटते
राष्ट्रवादी कधी शिवसेनेचे फोटो टाकत नाही. शिवसेना म्हणजे अंगावर पाल पडल्यासारखे त्यांना वाटते. मदतीचे पॅकेज जाहिर केल्यानंतरच्या अनेक पोस्टमधून मुख्यमंत्र्याचे फोटो इतर पक्षाच्या कार्यकर्त्यानी सोशल मीडियात टाकले नाहीत. शिवसेना व शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा आढावा सोशल मीडियावर शिवसैनिकांनी टाकावा. येणाऱ्या घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळावा. पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकद उभी करण्याचे काम या पुढील काळात करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त गटबाजीचा परिणाम शिरूर तालुक्यातील राजकारणावर होत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे-तांदळी रस्त्याच्या बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली.
राज्य शाससनाच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामे होत आहेत. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. गटतटाचे राजकारण तालुक्यात चालू देणार नाही. पक्षविस्तार व ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करा. आगामी ग्रामपंचायती निवडणूकीसाठी लक्ष द्या पक्ष वाढीसाठी नवीन लोकांनाही बरोबर घ्या.
– माऊली कटके, जिल्हा प्रमुख शिवसेना