मेढा – काही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित न ठेवता, निवडणूक संपली की सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी धडपडले पाहिजे. जी. जी. कदम अण्णांनी विकासाचे राजकारण केले. मात्र आत्ताच्या घडीला साताऱ्यात केवळ खुनशीचे राजकारण चालू आहे, अशी खुनशी प्रवृत्ती असलेल्या राजकीय नेत्यांना निवडून देऊ नका, हीच खरी जी. जी. कदम अण्णांना श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेढा येथे आयोजित सहकार मेळाव्यात केले.
स्व. आ. जी. जी. कदम यांच्या 23 व्या स्मृतीदिनानिमित्त जी. जी. कदम प्रतिष्ठान यांच्यावतीने मेढा येथील पोलीस परेड ग्राऊंडवर सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी आ. शशिकांत शिंदे, सदाभाऊ सपकाळ, वसंतराव मानकुमरे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, नगराध्यक्ष अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, आजच्या राजकारणात एकमेकांवर खुन्नस ठेवण्याचा प्रकार दुर्देवी आहे.
जी. जी. कदम अण्णांचा माझा फारसा परिचय नसला तरी त्यांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. राज्याच्या विकासात राष्ट्रवादी कॉंग्रेससारखा पक्ष नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार भल्याभल्यांना समजणार नाहीत. विकास हे न संपणारे व्रत आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला आदर्श संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांपासून आमदार जी. जी. कदम यांनी ती घातली. त्याच संस्कृतीचे जतन आज त्यांचे पुत्र अमित कदम करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, दुर्गम भागात अण्णांचे नेतृत्व घडले, तसा अण्णांचा आणि माझा परिचय कमीच. मात्र, अण्णांचे काम मी अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. दुर्देवाने अण्णा लवकर गेल्याने त्यांची मोठी पोकळी या भागाला निर्माण झाली आहे. तसेच सहकार टिकला पाहिजे. सर्व विषय तपासून प्रतापगड कारखान्याबाबत निणर्य घेतला जाईल.
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या संस्थांचा व सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याना जी. जी. कदम प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमित कदम यांनी केले तर आभार योगेश गोळे यांनी मानले.
प्रतापगड साखर कारखाना संकटमुक्त करा : अमित कदम
प्रतापगड सहकारी कारखाना संकटमुक्त करून येथील शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी प्रमुख मागणी ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभुराज देसाई यांच्याकडे केली आहे. यासोबत जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थ वाहिनी असलेला दूधपुरवठा संघाला सहकार्य करून पूर्ववत करा, जेणेकरून जावळी तालुक्याच्या विकासाला हातभार लागेल अशीही मागणी अमित कदम यांनी ये वेळी केली.