निर्यातबंदी उठवून बाजारभावचे संरक्षण द्या – शिरूरमध्ये शिवसेना आक्रमक
शिरूर (पुणे) -कांदा उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ शासनाने आणू नये. यासाठी त्वरित कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येऊन देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा शेतकरी असून कंगना राणावतला संरक्षण देता, आता शेतकऱ्याला निर्यातबंदी उठवून बाजारभावाचे संरक्षण द्या, असा टोला शिरूर-आंबेगाव शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार व शिरूर तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
करोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला. शेतकरी अडचणीत असताना गेल्या आठवड्यापासुन कांद्याला 3 हजार ते 4 हजारपर्यंत भाव मिळत असल्यामुळे शेतकरीराजा समाधानी होता; परंतु केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णया निषेधार्थ शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिरूर तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिरूर -आंबेगाव तालुका प्रमुख गणेश जामदार, युवासेना जिल्हा अधिकारी बापूसाहेब शिंदे, महिला जिल्हा उपसंघटक शैलजा दुर्गे, जिल्हा सल्लागार विजया टेमगिरे, नगरसेवक संजय देशमुख, महिला तालुका संघटक चेतना ढमढेरे, उपतालुका संघटक नंदा भुजबळ, शहर प्रमुख मयूर थोरात, वीरेंद्र शेलार, योगेश ओव्हाळ, संतोष भोंडवे, संजय पवार, समाधान डोके, आनंदराव हजारे, गणेश राऊत, वंदना ढमढेरे, संजय पवार, रणजीत ढवळे, संतोष पवार, धनंजय शेलार, हितेश शहा, पप्पू गव्हाणे, अजित शिंदे, सुरेश गाडेकर, रोहिदास खेडकर, अतुल खेडकर, अक्षय खेडकर, दत्ताभाऊ गिलबिले यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
शिरूर तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन केले जाते साठवून ठेवलेला कांदा बाजारात आणताना तीस ते पस्तीस रुपये बाजारभाव शेतकऱ्याला मिळत होता; परंतु या सरकारने निर्यातबंदी टाकून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मुळावर कुऱ्हाड मारून शेतकरी नेस्तनाबूत करण्याचे काम सुरू केले असल्याच्या आरोप शिवसेना शिरूर तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी केला आहे.