भारतातच नव्हे तर जगभरात सध्या पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परदेशी पर्यटकांमध्ये शिस्तबद्धपणा असतो; पण भारतातील अनेक पर्यटकांना अतिउत्साह, बेजबाबदारपणा आणि नियम-कायदे धाब्यावर बसवण्याची वृत्ती अंगलट येताना दिसत आहे. मध्यंतरी, माऊंट एव्हरेस्ट, मणिमहेश, चुडाधर या पर्यटनस्थळी झालेल्या दुर्घटना या पर्यटनाला जाणाऱ्यांनी विचारात घ्यायला हव्यात. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायलाच हवी; पण त्याच वेळी पर्यटकांनीही सूचनांची अमलबजावणी करायला हवी. अपघात किंवा दुर्देवी घटना घडल्यानंतर काही काळ जागरूक राहायाचे आणि नंतर “ये रे माझ्या मागल्या..’ ही सवय बदलली पाहिजे.
नव्या जागा पाहाणे, तिथल्या निसर्गाचा, वातावरणाचा आनंद घेणे, आपल्या अनुभवाच्या पोतडीत नवा अनुभव समाविष्ट करणे हा खरेतर पर्यटनाचा प्राथमिक उद्देश असतो. राष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर आर्थिक बळही पर्यटन व्यवसायातून मिळते. पर्यटन हा आनंददायी अनुभव असला तरी स्वतःच्या, परिसराच्या सुरक्षिततेचा विचार न करता केवळ मेंढ्याच्या कळपासारखे जाणे यात कसलेच शहाणपण नाही. ज्या ठिकाणी पर्यटकांसाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, स्थानिक प्रशासन काही निर्बंध घालत असेल, काही नैसर्गिक आपत्ती येऊ शकणार असतील त्यामुळे निर्बंध घातले जाणार असतील अशा ठिकाणी हौसेने पर्यटनासाठी जाण्याची गरज निश्चितच नसते. किमान स्व-सुरक्षेचा तरी किमान विचार करून पुन्हा परत येणे योग्य ठरते. पण अलीकडील काळात असा विचार होताना दिसत नाही. त्यामुळेच काही दुर्दैवी घटना घडताना दिसून येतात.
भारतातील पर्यटनाचे वर्णन सध्या “पर्यटकांची शर्यत’ असे करावे लागेल. जगभरातच एक पर्यटन शर्यत सुरू असल्याचे दिसते आणि भारतीय पर्यटक त्या शर्यतीत धावताहेत. अनेकांना हे रुचणार नाही, पण सध्या फिरायला जाणे याला आनंदापेक्षा प्रतिष्ठा, मोठेपणा दाखवण्याचे स्वरूप झाले आहे. माऊंट एव्हरेस्ट हे शिखर तर बहुतांश गिर्यारोहकांना आकर्षित करते, मात्र तिथे सध्या पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करताना अनेक जणांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडताहेत. पण तरीही माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्यांची रांग कमी होत नाही उलट वाढतच चालली आहे. दुसरीकडे यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे.
मध्यंतरी, प्रशासनाच्या परवानगीविनाच मणिमहेश या स्थळाची रोमांचकारी परंतु तितकीच धोकादायक यात्रा करण्यासाठी गेलेले पर्यटक बर्फवृष्टीमध्ये अडकले. स्थानिक प्रशासनाच्या अथक आणि तातडीच्या प्रयत्नांनंतरही त्यातील काही स्पर्धकांनाच वाचवण्यात यश आले. अर्थात प्रशासनाने पहिल्यापासूनच जास्त सावध आणि दक्ष राहिले पाहिजे, हे जितके खरे आहे तितकेच पर्यटकांनीही आपली जबाबदारी जाणून घेऊन त्यानुसार सतर्क राहणे आवश्यक आहे. मणिमहेशच्या बाबतीत पर्यटकांनी आपली जबाबदारी समजूनच घेतली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
हिमाचल प्रदेशातील चुडधार पर्वतही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. परंतु तिथे येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांनी डोक्याला वात आणला आहे. स्थानिक प्रशासन आणि स्थळ व्यवस्थापन दोन्हींकडून “चूडधार यात्रा सध्या करू नये’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पर्यटक असमंजसपणा दाखवत तिथे जातात आणि मग अडचणींना तोंड द्यावे लागते. चूडाधार पर्वत हा बर्फाच्छादित प्रदेश आहे, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. काही दिवसांपूर्वी मंदिर व्यवस्थापक आणि समाजसेवक हे त्रास सहन करत स्वमर्जीने तिथे गेले आणि तिथे अस्वस्थ होऊन पडलेल्या 19 वर्षीय पर्यटकाला पाठीवर उचलून दुसऱ्या जागी नेऊन पोहोचवले. या तरूण पर्यटकाने सर्व परिस्थितीची कल्पना असूनही स्वतःचे प्राण धोक्यात घातले होते. ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना त्या परिसरात घडलेल्या आहेत.
काही महिन्यांपुर्वी एक नवविवाहित जोडपे पर्यटक तिथे रस्ता चुकले आणि रात्रभर वेफर्स खाऊन पाणी पिऊन रात्र काढली. प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना शोधले. नुकतेच दोन तरूण डॉक्टर चुडाधारला जाण्यासाठी निघाले. त्यातील तरूणाची तब्येत रस्त्यात बिघडली म्हणून तो ढाब्यामध्ये थांबला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांपैकी डॉक्टर तरूणीने आपल्या आजारी मित्राबरोबर परत यायचे सोडून ती एकटीच पुढे चुडाधारला निघून गेली. इकडे या तरूणाची तब्येत जास्तच बिघडली आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. अर्थातच, यामध्ये पर्यटकांची चूक आहे. आपल्याकडे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक बुडून मरण पावल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. वास्तविक, या ठिकाणी सूचनाफलक लावलेले असतात. स्थानिकांकडूनही भरती-ओहोटीबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले जातात. पण तरीही अतिउत्साही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि खोल समुद्रात जातात व मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. उंच गडकिल्ल्यांवर गेल्यानंतरही सेल्फी काढण्याच्या नादात खोल दरीत कोसळल्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. तिथेही पर्यटकांचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असतो. पावसाळ्यात धबधब्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनाही यामुळेच घडत असतात.
मुळात कोणत्याही ठिकाणी अपुऱ्या माहितीच्या आधारे, विचार न करताच निष्काळजीपणे फिरायला जाणे हा असमंजसपणा आहे. बरेचदा अशा वेळी पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्नही केला जातो; पण ते ऐकण्याचा मनःस्थितीत नसतात, तर स्वतःचेच खरे कऱण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अतिरेकी, उच्छृंखल स्वभावामुळे पर्यटकांना जीवाला मुकावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यटनाबाबत आपण मेंढ्यासारखे वागत नाहीत ना याचा विचार पर्यटकांनी करायला हवा. ज्या पर्यटन स्थळांवर किमान सुविधाही उपलब्ध होऊ शकत नाहीत, ज्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी सरकार किंवा स्थानिक प्रशासन निर्बंध लावत असेल, बर्फवृष्टी किंवा इतर काही नैसर्गिक संकटांची चाहूल लागल्यामुळे पर्यटकांना जाण्यापासून रोखले जात असेल तिथे जाण्याचा हट्ट पर्यटकांनी न केलेला बरा. काही जागा अशा आहेत जिथे आता कमीत कमी पर्यटक जाणे हे हितावह आहे. आपल्याला परदेशातील अनेक गोष्टींचे, लोकांचे कौतुक असते पण पर्यटनाच्या बाबतीतही परदेशी लोकांकडून काही सवयी जरूर शिकल्या पाहिजेत. पर्यटनावर आर्थिक मदार असलेल्या अनेक लहान लहान देशांनी पर्यटन व्यवस्थापनात मोठी सुधारणा केली आहे. उदाहरणार्थ व्हेनिस या देशाने त्यांची क्रूझ जहाजे मर्यादित केली आहेत.
आईसलॅंड हा देश नव्या जागांना प्रोत्साहन देत आहे. कोपेनहेगेन पर्यटकांना विविध जागी पोहोचवत आहेत. क्रोएशियाने पर्यटकांची मर्यादा निश्चित केली आहे. या वर्तुळात एक घटना उल्लेखनीय आहे. पॅरिसमध्ये एका संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी जास्त झाल्याने तिथले कर्मचारी बाहेर निघून गेले. अर्थात परदेशी पर्यटक आणि स्थानिक पर्यटक यांच्या वर्तणुकीतही बराच फरक पडतो. भारतीय लोक जेव्हा परदेशी पर्यटनासाठी जातो तेव्हा अत्यंत शिस्तीत, व्यवस्थित जातात; मात्र पुन्हा देशात परतल्यानंतर स्वयंशिस्त, व्यवस्थितपणा सर्वच गुंडाळून ठेवताना दिसतात. आपल्याला अतिउत्साही, बेशिस्त चालकांची गरज नाही तसेच स्वतःचे आरोग्य आणि सुरक्षा याविषयी बेपर्वा असलेल्या पर्यटक पाहुण्यांचीही गरजच नाही. अशा बेपर्वा पर्यटकांना प्रवास करू देण्यास स्थानिक प्रशासनानेच बंदी केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला त्याची कितीही मोठ्या व्यक्तींशी ओळख असली तरीही पर्यटनाला जाताना शिस्तभंग करणे, गोंधळ घालण्याची परवानगी नक्कीच दिली जाऊ शकत नाही. पॅरा ग्लायडिंग, ट्रेकिंग, जलपर्यटन, साहसी खेळ अशात सहभागी होण्यासाठी प्रत्येक भागात एकच प्रवेश मार्ग असावा जिथे पर्यटक स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. प्रशासनाकडूनही अशा ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा या दोन्हीच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवल्या गेल्या पाहिजेत.
याही प्रकारे अपघात किंवा दुर्देवी घटना घडल्यानंतर काही काळ जागरूक राहायाचे आणि नंतर “ये रे माझ्या मागल्या..’ ही सवय बदलली पाहिजे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला त्यांच्याकडील बहुमुल्य संसाधनाचा वापर करावा लागतोच. पण पुरेशी सावधानता बाळगल्यास नंतर होणारा खर्च वाचवता येऊ शकतो. पुरातन काळातील वास्तू किंवा महत्त्वाच्या जागांवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असेल तर त्या वास्तूचे, परिसराचे महत्त्व कमी होत नाही. प्राचीन जागांचे योग्य व्यवस्थापन कसे असावे या संदर्भात अमेरिकेतील एरिझोनाकडून काही गोष्टी जरूर शिकण्यासारख्या आहेत. एरिझोनामधील द व्हेव हे स्थळ पहाण्यासाठी एका दिवसात केवळ 20 पर्यटकांनाच पाठवले जाते. यासाठी लॉटरी किंवा सोडत काढली जाते. आपल्या देशात काही उत्तम पण ऐतिहासिक जागांबाबत असे पर्याय विचारात घ्यायला हवेत.
पर्यटनस्थळी जाऊन पर्यटकांचा धिंगाणा घालण्याचे प्रकार आपल्याकडे काही नवे नाहीत, मात्र पर्यटनस्थळांच्या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि स्थळांचे जतन करण्यासाठी देखील पर्यटकांमध्ये स्वयंशिस्त फार महत्त्वाची आहे.
प्रा. शुभांगी कुलकर्णी