मुंबई : शिवसेनेने दिल्लीचे तख्त काबीज केले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, अशा शब्दात शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बुधवारी आपल्या भावनांना वाट करून दिली. उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आम्ही सरकार स्थापन करणार आहोत हे आम्ही पहिल्या दिवसापसून सांगत आहोत. मी म्हणालो होतो, सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षितरित्या उतरेल. पण, त्यावेळी सारे जण आम्हाला हसत होते. पण आता आमचे सूर्ययान यशस्वीरित्या उतरले आहे. शिवसेनेचे असेच सूर्ययान दिल्लीच्या तख्तावर उतरले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, असे राऊत म्हणाले.
अजित पवार यांच्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्या शपथ घेतील. अजित पवार यांची भूमिका स्पष्ट होती. ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेतील असे विचारता राऊत म्हणाले, अजित पवार परत येतील असे मी म्हणालो होतो. मी असेही म्हणालो होतो, शरद पवार यांना समजून घयायला शंभर जन्म घ्यावे लागतील.
फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी अवघ्या तीन दिवसांत आपल्या पदाचा राजिनाम दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार गुरूवारी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.