राज्यातील करोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिली तर पुन्हा एकदा राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याने सामान्य नागरिक गांभीर्याने या संकेताचा विचार करतील, अशी आशा करावी लागेल.
गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यातील बहुतेक सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यानंतर सामान्य नागरिकांनी करोनाबाबतची मूलभूत काळजी घेण्याचे सोडूनच दिल्याने गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. आठवड्याभराच्या कालावधीमध्ये वीस हजारांवर रुग्णांची संख्या गेली आहे आणि दररोज त्याच्यामध्ये भरच पडत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील परिस्थिती अतिशय बिकट होऊ पाहात आहे. कारण रुग्णांच्या वाढीचा सर्वात जास्त वेग विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आहे.
अर्थात, काहीप्रमाणात राजधानी मुंबई आणि महानगर पुणे आणि आसपासच्या प्रदेशातही रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने सर्वांनीच काळजी घेण्याची हीच वेळ आहे. विदर्भातील रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील प्रशासनाने पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ज्या ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणच्या सर्व समारंभ आणि उत्सवांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. विदर्भातील शाळा आणि महाविद्यालयेही अद्याप संपूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाहीत. अशाच प्रकारची परिस्थिती राज्याच्या इतर भागांत येऊ नये असे वाटत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घेऊन दैनंदिन व्यवहार काळजीपूर्वक करण्याची गरज आहे.
साधारण एक वर्षापूर्वी आपली परिस्थिती काय होती, याचा विचार करूनच काळजी घेण्याची गरज किती आहे हे लक्षात घ्यावे लागेल. गेल्या वर्षी मार्च महिन्यानंतर महाराष्ट्र आणि देशात सर्वत्र जेव्हा लॉकडाऊनला सुरुवात झाली तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल झाले ते लक्षात घेऊनच तशीच परिस्थिती पुन्हा यावी, असे वाटत नसेल तर करोनावर मात करण्यासाठी जी त्रिसूत्री सांगण्यात आली आहे त्याचे गांभीर्याने पालन करावे लागणार आहे. सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत असलेल्या बातम्या पाहता कोणीही गांभीर्याने मास्कचा वापर करत आहे, असे दिसत नाही. राज्यात सर्वत्र सर्वसाधारण बाजारपेठा आणि इतर सर्व कार्यालये शंभर टक्के सुरू झाली असून या सर्व संस्थांमध्ये व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक व्यवहार करताना योग्य अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री अमलात आणली आहे की नाही, याचीच शंका येते.
करोना महामारीच्या संकटाने देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुरेशा प्रमाणात संकटात टाकल्याने आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, तर वैयक्तिक पातळीवर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय ज्या विविध संस्था नागरिकांच्या संपर्कात येतात त्यांनीही आपापल्या पातळीवर अतिउच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था अमलात आणायला हवी. राजधानी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. वाहिन्यांवरील या उपनगरीय रेल्वे सेवेचे व्हिडिओ पाहात असताना किती नागरिक मास्क वापरून आणि इतर काळजी घेऊन प्रवास करत आहेत, हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. ज्या प्रकारची काळजी गेल्या वर्षी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये घेण्यात येत होती त्याच प्रकारची काळजी सध्या घेण्यात आली नाही तर दुर्दैवाने पुन्हा एकदा राज्याला करोना महामारीच्या उत्तरार्धात सामोरे जावे लागणार आहे.
आता कोठे अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था सावरत असताना पुन्हा एकदा जर लॉकडाऊन लागू झाले तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाणार आहे आणि ती सावरणे अशक्य होणार आहे, हा विचार सर्वांनीच करायला हवा. प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर सुरक्षा आणि काळजी घेतली तर करोनाचा प्रसार होण्यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण बसू शकते, हा आजवरचा अनुभव आहे. वर उल्लेख केलेल्या त्रिसूत्रीचा वापर करताना कमीत कमी प्रमाणात लोकांच्या संपर्कात येणे आणि एखाद्याला थोडी जरी करोनाची लक्षणे दिसत असली तरी वैद्यकीय सल्ला घेणे अशा प्रकारच्या प्राथमिक उपायांनीही करोना महामारीच्या प्रसारावर नियंत्रण बसू शकते.
सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, या एकाच उद्देशाने जर सरकारने सर्व प्रकारचे व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर सरकारने त्यासाठी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांचे कठोर पालन करणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य ठरते. पण ज्या अर्थी गेल्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्या अर्थी या नियमांचे पालन गांभीर्याने केले जात नाही, हा एकच निष्कर्ष काढता येतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये सर्व व्यवहार बंद असल्याने किती मोठ्या प्रमाणात समाजातील सर्वच घटकांना फटका बसला याचे उदाहरण समोर असतानाही जर सर्वसामान्य नागरिकांना शहाणपण येत नसेल तर ते दुर्दैव म्हणावे लागेल. जगातील इतर देशांच्या तुलनेने भारतामध्ये करोनाचा प्रसार नियंत्रणात असण्यामागे भारताने लॉकडाऊन कडकपणे अमलात आणले हेच कारण होते. पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जर पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असेल गेल्या वर्षभराच्या अनुभवातून सामान्य नागरिकांनी कोणताच धडा घेतला नाही असे म्हणावे लागते.
आगामी कालावधीमध्ये जर या संकटावर संपूर्णपणे मात करायची असेल तर प्रशासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीची संपूर्णपणे अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. करोनावर लस जरी उपलब्ध झाली असली तरी अद्यापपर्यंत ती सर्वांपर्यंत पोहोचली नाही. लसीकरणाच्या आशेवर जर सामान्य नागरिकांनी निष्काळजीपणा केला तर तो आगामी काळामध्ये चांगलाच महाग ठरू शकेल. पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन कोणालाच परवडणार नाही, हे लक्षात घेऊनच सर्वांना काळजीपूर्वक वागावे लागणार आहे.