पुणे – देशातील कोरोना विषाणू संकटाला थोपवण्यासाठी देशभरामध्ये लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आलाय. या देशव्यावी लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असून देशातील नागरिक घरामध्येच सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करताना दिसत आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी लॉक डाऊन अत्यावश्यक असला तरी यामुळं घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. अशातच घरगुती हिंसाचाराच्या घटनांना अटकाव करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे नामी शक्कल लढवण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील घरगुती हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घरगुती हिंसा करणाऱ्याला क्वारंटाईन करण्याची घोषणा केली आहे. याबाबत प्रसाद यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेशी संवाद साधताना, “महिलांविरोधात घरगुती हिंसेच्या प्रकरणात आम्ही प्रथम समुपदेशन करू. मात्र तरी देखील प्रश्न न सुटल्यास घरगुती हिंसा करणाऱ्याचे संस्थात्मक विलगीकरण करू.” अशी माहिती दिली.
दरम्यान, सध्या कोरोना विषाणूमुळे ‘क्वारंटाईन’ अर्थात विलगीकरण हा शब्द सर्वांच्याच परिचयाचा झाला असून पुणे जिल्हा परिषदेच्या निर्णयामुळे महिलांसोबत घरगुती हिंसाचार करणाऱ्या महाभागांना क्वारंटाईनची अनुभूती देखील घेता येणार आहे.