निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. पॉल म्हणतात की “घरातही आता मास्क घालण्याची वेळ आलीय. एकमेकांसोबत बसतानाही मास्क घालावं. याचा खूप फायदा होतो. डॉ. पॉल यांचं हे वक्तव्य भारतातील कोव्हिड-19 च्या बिघडणाऱ्या परिस्थितीचं वास्तव दर्शवणारं आहे, असंही काही जण म्हणत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने, घरात प्रत्येकाने मास्क केव्हा घालावं याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार घरातील नसलेला, नवखा व्यक्ती घरी आल्यास, हवा खेळती राहण्यासाठी योग्य दरवाजे, खिडक्या नसल्यास आणि दोन व्यक्तींमध्ये 1 मीटरचं अंतर ठेवणं अशक्य असल्यास घरात मास्क वापरावा.
एक वेळ घरात हवा खेळती राहू शकते. पण दोन व्यक्तींमध्ये 1 मीटरचं अंतर नसेल, अशा परिस्थितीत घरात मास्क वापरणं योग्य असंही काही जण सांगत आहेत. तर अनेकांच्य मते, घरासारख्या बंदिस्त वातावरणात मास्क वापरल्यास गुदमरण्याची भीती जास्त आहे. घरात मास्क घालण्याचा फायदा होऊ शकतो. पण, प्रॅक्टिकली हे शक्य नाही. मास्क घालताना आणि काढताना योग्य काळजी घ्यावी लागते. घरात लोकांचा एकमेकांशी संपर्क येतो. मास्क योग्य ठिकाणी न ठेवल्यास संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे घरी मास्क घालणं शक्य होणार नाही. अनेकांना दमा, मधूमेह असतो. मास्क दिवसभर घातला तर, शरीरात कार्बनडायऑक्साइडचं प्रमाण वाढेल आणि ऑक्सिजनचं कमी होईल, असे हे तज्ञ म्हणतात.
एकीकडे, त्सुनामीसारख्या पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भारताला विळखा घातलाय. भारतात गेले सहा दिवस सलग तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद होते आहे, तर दुसरीकडे रोज बरे होणारे रुग्ण बाधितांपेक्षा जास्त असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे मास्कच्या वापराविषयी सामान्य लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.
लॅन्सेट जर्नलने कोव्हिड-19 चा प्रसार हवेतून होतो आणि संशोधनातून याचे पुरावे मिळाल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या मते आता कोरोनाचा प्रसार हवेतून होतोय. यावर केंद्र सरकार म्हणतंय की, देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनलीय. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या पहाता, नागरिकांनी घरात मास्क वापरावा. जर घरात क्वारंटाईन होणं शक्य नसेल, तर क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं असंही सरकार सुचवत आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येपैकी 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं आढळून येत नाहीत. पण कोव्हिड-19 ची लक्षणं नसलेला व्यक्ती कामानिमित्त बाहेर फिरताना किंवा घरी संसर्ग पसरवू शकतो.
म्युटेट झालेला (बदललेला) व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त भयंकर आहे. हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. यामुळे घरातील एका सदस्याला लागण झाली, तर संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होत असल्याचं दिसून आलंय. लक्षणं नसलेल्या लोकांमुळे घरी संसर्ग पसरतोय. त्यामुळे सद्य स्थितीत घरात राहूनही आपण एखादं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाल्याचं पहातोय.
मात्र, काही जणांच्या मते, होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कुटुंबातील व्यक्तींशी जेवण, औषध किंवा पाणी देण्यावेळी संपर्कात येताना मास्क वापरावा. कुटुंबातील सदस्यानेही मास्क घालणं गरजेचं आहे. दोघांमध्ये 6 ते 10 फुटांचं अंतर असलं, तरी दोन मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त सर्वच सदस्यांनी सतत मास्क लावून घरात बसणं विविध आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं.
कोव्हिड रुग्ण घरातील एका खोलीतच रहाणार असेल आणि बाहेर येणार नसेल तर त्याने मास्क घालण्याची गरज नाही. पण कोणत्याही कारणासाठी त्याला बाहेर यावं लागल्यास रुग्णासह घरातील सर्व सदस्यांनी मास्क वापरावा.
केंद्र सरकारची घरी मास्क घालण्याची सूचना, धोक्याचा इशारा समजली पाहिजे. काळजी घेताना बेपर्वाई होता कामा नये. आपल्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. घरी काम करण्यासाठी येणाऱ्यांकडूनही संसर्ग पसरू शकतो. कोरोनासंसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी घरी मास्क घालण्याची सूचना करण्यात आली आहे. सुरक्षित रहाण्यासाठी सद्य स्थितीत घरात असताना सर्वांनी मास्क घालावं, असं अनेक तज्ञांना वाटतं.