नवी दिल्ली – करोनामुळे गेल्या 25 मार्चपासून बंद असलेली देशांतर्गत विमान वाहतूक आता येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. ही वाहतूक संयमित पद्धतीने सुरू केली जात आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
त्यांनी एका ट्विटर संदेशाद्वारे सर्व विमान कंपन्यांना आपली सेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे. विमान प्रवास वाहतुकीसाठीची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टिम नागरी विमान वाहतूक खात्यातर्फे लवकरच जाहीर केली जाणार आहे.
सुरुवातीच्या काळात विमानातील मधले सीट मोकळे ठेवून मर्यादित प्रवासी संख्येतच ही विमान वाहतूक सुरू करण्यास विमान कंपन्यांना अनुमती देण्यात येत आहे. गेले तब्बल दोन महिने ही विमानसेवा बंद असल्याने विमान कंपन्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडूनही काही मदतीचा हात मिळालेला नाही.