ठाणे – डोंबिवली अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तब्बल 33 आरोपींनी बलात्कार केल्याचे समोर येताच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. या मागणीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
यातील 22 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपींना येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्यांची आणखी चौकशी करणार आहेत. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी मानपाडा पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची पाच दिवस म्हणजेच येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला. आरोपींना कोर्टात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.