नवी दिल्ली – कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आज हयात नाहीत. मात्र, त्यांनी 1998 मध्ये एक भविष्यवाणी केली होती. ती आज खरी ठरताना दिसत आहे असा दावा एका महिला पत्रकाराने एका लेखात केला आहे. निरजा चौधरी यांचा एक लेख एका प्रख्यात माध्यमाने प्रकाशित केला आहे. त्यात त्यांनी एक माहिती उघड केली आहे. राव हे विद्वान होते.
अनेक भाषांचे जाणकार होते. भारताला उदारीकरणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे आणि देशातल्या बऱ्याच आर्थिक सुधारणांचे श्रेय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणेच त्यांना तसे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणारे आणि मुळात तशी दिशा ठरवणारे नरसिंह राव होते असे आता म्हटले जाते.
राव यांचा राजकीय निवृत्तीचा काळ आणि नंतरच्या बाबींचा या लेखात उल्लेख नाही. मात्र, 1998 मध्ये जेव्हा सीताराम केसरी यांच्याकडून सोनिया गांधी यांच्याकडे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा जेव्हा सोपवण्यात आली तेव्हा आता पुढची 25-30 वर्षे कॉंग्रेसची धुरा गांधी नेहरू कुटुंबाकडे राहील अशी भविष्यवाणी त्यांनी तेव्हा केली होती असे त्या लेखात म्हटले आहे. जी खरी ठरली आहे.
मात्र, त्यानंतर बराच काळ आता बदलला आहे. देश बदलला आहे व कॉंग्रेसही बदलली आहे. हा मुद्दा मांडताना गेल्या पंधरवड्यातील राजस्थानातील घटनाक्रम लेखिकेने सांगितला आहे. लेखात म्हटल्यानुसार पूर्वी जी. के. मूपनार, एम. एल. फोतेदार, बुटा सिंह किंवा केसरी यांना कॉंग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाठवले जायचे.
जेव्हा हे मुख्यमंत्र्यांकडे जायचे तेव्हा मुख्यमंत्र्यांना धडकी भरायची. कारण ते बऱ्याचदा एक ओळीचे राजीनामा पत्र घेउन आलेले असायचे व श्रेष्ठींनी पाठवलेल्या दूताकडे केवळ स्वाक्षरी करण्याचे काम कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना असायचे. आता काळ बदलला आहे. राजस्थानच्या घटनेवरून हे सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसची देशातील सत्ता तर गेलीच. मात्र गांधी नेहरू घराण्याची पक्षावरील पकडही ढिली झाली असल्याचे गेहलोत यांनी केलेल्या कृतीवरून स्पष्ट झाले आहे.