खडकवासला – “मंदिरे बंद असल्यामुळे असंख्य व्यावसायिक भरडले गेले आहेत. व्यावसायिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. मंदिरच बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील व्यापार ठप्प आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरांबाबतही सकारात्मक निर्णय घ्यावा,’ अशी अपेक्षा मंदिरावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
कोंढाणपूर येथे तुकाईमातेचे मंदिर आहे. येथे राज्यभरातून भाविक येतात. मात्र, करोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांचा शुकशुकाट आहे. करोनामुळे भाविकच येत नसल्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. “सरकारने आम्हाला योग्य ती मदत करावी,’ अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्त केला.
कोंढाणपूरसह सिंहगड व शिवगंगा परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी मुंबई, पुणे-नाशिक कोल्हापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून व राज्याबाहेरील अनेक भाविक, भक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे चहाच्या स्टॉलपासून ते हॉटेल, लॉज तसेच हार, फुले व प्रसाद विकणाऱ्यांचा व्यवसाय चालतो. पण, सरकारला याचे गांभीर्य नाही, अशी प्रतिक्रिया व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
मंदिर व गड-किल्ले बंद असल्यामुळे माझ्या हॉटेल व आईस्क्रीम फॅक्टरी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मंदिर बंद असले, तरी सर्वत्र राजकीय सभा-आंदोलने मात्र सुरू आहेत. तिथे करोना पसरत नाही का? मंदिरांतूनच करोना पसरतोय का? मंदिरात शासकीय नियमांचे पालन केले जाते. आम्हीही नियमांचे पालन करत असतो. बाकी सर्व खुले असताना मंदिरही उघडली जावीत, अशी अपेक्षा
रामदास मुजुमले, व्यावसायिक, कोंढाणपूर