मुंबई – कोणत्याही स्थितीत राज्यात भाजपाला पुन्हा सत्ता मिळवून देत नाही, असा दिलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा आमदारांना दिला. भाजपच्या धोरणांवर टीका करतानाच त्यांच्या नेत्यांची समर्पितता आणि आपल्या कामाच्या मार्केटींगचे कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला पवार यांनी दिला.
महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या आमदारांनी पवार यांची भेट घेतली. त्यात आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील या आमदारांनी पवार यांची भेट घेतली.
जवळपास दोन तास ही बैठक चालली. यावेळी पवारांनी युवा आमदारांची मते जाणून घेतली आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी कानमंत्रही दिला.
भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपाला आक्रमक उत्तर
सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमकपणे उत्तरे देण्याचा निर्णय झाला. मलिक यांच्याकडे सध्या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. गोंदियाचे पालकमंत्रीपद प्राजक्त तनुपरे यांच्याकडे तर परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मलिक यांच्याकडील कौशल्य विकास खाते राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक खाते हे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले जाईल. फडणवीस यांनी 2024 नंतर सत्तेत येऊ, असे सांगितले आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीचे सरकार 2024 पर्यंत राहील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.