यशाला अनेक बाप असतात. अपयश मात्र पोरके असते, असे पूर्वी म्हणायचे. मनसेचे राज ठाकरे यांनी त्यात थोडी दुरुस्ती केली. अपयशानंतर सल्लागार अनेक असतात, असे ते म्हणाले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हे भाष्य केले होते. केवळ त्यांनाच अथवा त्यांच्याच पक्षाला हे लागू होते असे नाही. ते सगळ्यांसाठीच आहे. विशेषत: कॉंग्रेसला क्षणोक्षणी त्याची प्रचिती येत असावी. त्याला कारण दिल्ली विधानसभेतील पराभव. कॉंग्रेसचे विविध प्रांतातील नेते आता पराभवाबद्दल जाहीरपणे बोलू लागले आहेत. जेव्हा जाहीर बोलणारे काही उभे राहतात, तेव्हा कुजबुज करणाऱ्यांची संख्याही वाढते. गेल्या आठवड्यात जयराम रमेश, मिलिंद देवरा आदी नेत्यांनी पराभवाबद्दल भाष्य केले. त्यानंतर अँटोनी आदी नेत्यांनी त्याला उत्तर दिले.
मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह नेहमीच बोलत असतात. त्यांच्या विधानांनी पक्षाला मदत होण्यापेक्षा अडचणच अधिक होते. ज्योतिरादित्य शिंदेही बोलले. आता त्याच मालिकेत संदीप दीक्षित यांच्या विधानाची भर पडली आहे. त्यांना शशी थरूर यांनी अप्रत्यक्ष समर्थन दिले आहे. पक्षात बदल करायला हवेत असा या सगळ्यांच्या वक्तव्याचा सार आहे. तो समजून घेतला पाहिजे. मात्र, तसे न करता कोणीतरी गांधी घराण्यालाच विरोध करतो आहे, एवढा मर्यादितच अर्थ काढला गेला की स्तुतिपाठकांना रान मोकळे मिळते. कॉंग्रेसच्या बाबतीत तेच झाले आहे. गांधी कुटुंबाशी कथित निष्ठा व्यक्त करण्याचे भासविण्यात हे लोक पक्षाचेच नुकसान करत आहेत. त्यात अर्थातच गांधी कुटुंबाचीही हानी होत आहे, याचे त्यांना भान राहिलेले नाही. त्यामुळे कोणी, ज्योतिरादित्य अथवा देवरा काही बोलले की त्यांच्यावर तुटून पडण्यातच धन्यता मानली जाते.
पक्षाला सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पक्षाची धुरा अन्य व्यक्तीकडे सोपवली पाहिजे. ती व्यक्ती गांधी कुटुंबाच्या बाहेरची असावी, असे संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे. संदीप दीक्षित दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. दिल्लीत शीला दीक्षित यांची सलग 15 वर्षे एकहाती सत्ता होती. मात्र आम आदमी पक्षाचा उदय झाल्यानंतर कॉंग्रेस नामशेष झाली. सत्ता मिळणे तर सोडाच, कॉंग्रेसला दिल्लीत सलग दुसऱ्या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. त्यामुळे संदीप दीक्षित यांचा त्रागा समजण्यासारखा आहे. बरे त्यांच्या निष्ठेबद्दल शंका घेण्याचेही काही कारण नाही. त्यांच्या आई ह्या सोनिया गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय. त्यांचे आजोबा कॉंग्रेसभक्त. राहुल यांनाही शीला दीक्षित यांच्याबद्दल असलेला आदर वेळोवेळी दिसला आहे. असे असताना संदीप दीक्षित काही म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्याकडे संकुचितपणे पाहणे कर्मदरिद्रीपणाचे लक्षण.
मध्यंतरी बराच काळ राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा होती. त्यांनी पक्षात बरेच बदल करण्याचा प्रयत्न केला. जनाधार वाढविण्यासाठी खटपट केली. देशभर प्रवास केला, सभा घेतल्या. नरेंद्र मोदींविरोधात एकहाती किल्ला लढविला. सर्वसामान्यांचा पक्ष ही पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित करण्याचा त्यांचा मानस होता. त्याकरता संघटनात्मक निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी अभिनव कल्पना राबविली. नेत्यांच्या मुलांनीच थेट पदावर येऊन बसावे, हे राहुल यांना मान्य नव्हते. त्याकरताच त्यांनी निवडणुकीद्वारेच पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड झाली पाहिजे, असा बंदोबस्त केला. जुन्यांना बाजूला काढण्याची त्यांचीही इच्छा नव्हती, अथवा नसावी. मात्र, जुनी मंडळी सन्मानाने हटायला तयार नाहीत. दशकोनदशके घरातच सत्तेची सगळी पदे भूषविल्यावरही त्यांचे समाधान नाही. कुठे त्यांच्याऐवजी अन्य होतकरू व्यक्तीला संधी दिली गेली की, निष्ठेचा हवाला देत अन्याय झाल्याचा राग आला पण ही मंडळी अव्वल.
हे चित्र आपण बदलूच शकत नसल्याचे लक्षात आल्यावर लोकसभेतील पराभवानंतर राहुल स्वत:हून बाजूला झाले. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून सर्व पातळीवर मनधरणी झाली. मात्र, राहुल बधले नाही. तेव्हा निष्ठावानांनी प्रियंका वढेरा यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तेथेही डाळ शिजली नाही. अखेर आजाराचा सामना करत असणाऱ्या सोनिया गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपदी बसविण्यात आले. यात एकीकडे आपली निष्ठा प्रदर्शन तर होतेच, शिवाय यातून आपल्या पुढच्या पिढ्यांचेही बस्तान बसविले जाते, असा सरळ हिशेब. आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य कॉंग्रेसमध्येच पाहात असणाऱ्या नेत्यांची ही चापलुसी. ज्यांच्यावर निष्ठा दाखवण्यासाठी स्पर्धा असते, त्यांनाच पणाला लावण्याचा हा प्रकार आहे. संदीप दीक्षित जे बोलले ते योग्यच.
खुद्द राहुल यांनाही तेच अभिप्रेत होते. कारण किमान त्यांच्या राजीनाम्यानंतर तरी काही ठोस पावले उचलली जातील, पक्षाला घट्ट वेढा घालून बसलेल्यांचे पाश सैल होतील आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. ती पूर्ण झालीच नाही. जोपर्यंत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीबाहेरचा चेहरा आणला जात नाही, तोपर्यंत बदल दिसणार नाही, हे सत्य आहे. भाजपनेही तेच केले. आम आदमी पक्ष नवा आहे. त्यांनी राजकारणाच्या परिघाबाहेरचेच चेहरे आणले. त्यामुळे त्यांना स्वीकारले गेले. हे कॉंग्रेसमधील नेत्यांनाही समजते आहे. मात्र, स्वार्थ वरचढ ठरतो. पक्षाला दिल्लीत अथवा अन्यत्र जी काही मते मिळाली आहेत, ती गांधी कुटुंबामुळेच. तेही सत्यच आहे. मात्र, त्या कुटुंबांनंतर खाली त्यांना आपलेच कुटुंब हवे आहे. नवे चेहरे नको आहोत. येथेच कोंडी झाली आहे.
भाजप दुबळा झाला तर आपल्याला पुन्हा संधी आहे, अशी कॉंग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे. तेही खरे आहे. जनता पक्षाचा प्रयोग झाल्यावर पुन्हा कॉंग्रेसच सत्तेत आली. मात्र, त्यावेळी इंदिरा गांधी यांचे बलशाली नेतृत्व होते. आता ती स्थिती नाही, या वास्तवाचाही कुठेतरी स्वीकार होणे गरजेचे आहे. शिवाय भाजप दुबळी होत असली तरी त्याचा लाभ घेण्याची कुवत टिकवून ठेवली आहे का, याचाही कॉंग्रेसला विचार करावा लागेल. ज्या वेगाने आम आदमी पक्षाने दिल्लीतील राजकीय अवकाश व्यापून टाकले तसे देशभरात अन्यत्र होणारच नाही, असा भाबडा विश्वास कॉंग्रेसचे नुकसानच करणार. त्यामुळे पक्षातले जुने-नवे नेते परिवर्तनाची जी साद घालत आहेत, त्याचा सूज्ञपणे विचार करणेच पक्षाच्या हिताचे आहे. शेवटी निष्ठा पक्षाशी असावी, कुटुंबाशी अथवा व्यक्तीशी नव्हे.