वडगावशेरी- तलाठी कार्यालय म्हटलं की नागरिकांची ओसंडलेली गर्दी डोळ्यासमोर येते. या-ना त्या कारणांनी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावेच लागते. परंतु, संपूर्ण आठवड्यात दोनच दिवस तलाठी येत असतील तर कामे होणार तरी कशी? त्यामुळे आता वडगावशेरीत “कोणी तलाठी देता का तलाठी’, अशी मागणी नागरिकांनी फ्लेक्स् लावून प्रशासनाकडे केली आहे.
वडगावशेरीमध्ये तलाठी कार्यालय आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे पूर्ण वेळ तलाठी नाही. वडगावशेरीला पूर्ण वेळ तलाठी द्यावा, अशी मागणी वडगावशेरी नागरिक मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनी हवेली तहसीलदार यांच्याकडे केली आहे. वडगावशेरी परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील रहिवाशांना सातबारा, फेरफार, सातबाऱ्यावर नाव लावणे, उत्पन्नाचा दाखला काढणे अशा विविध महसुली कामांसाठी वडगावशेरी तलाठी कार्यालयात जावेच लागते. परंतु, या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार लोहगाव येथील तलाठ्यांकडे दिलेला आहे. त्यामुळे तलाठी वडगावशेरीमध्ये सोमवारी व गुरुवारीच येतात. यातून कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.यामुळे वडगावशेरीला पूर्णवेळ तलाठी मिळावी, अशा मागणी “जनता परेशान है’ असा फलक तलाठी कार्यालयाशेजारी लावून करण्यात आली आहे.
वडगावशेरीला पूर्णवेळ तलाठी नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. आता सगळीकडे शाळांचे प्रवेश सुरू आहेत. तलाठी नाहीत म्हणून कागदपत्रं मिळाली नाहीत, हे कारण नागरिकांना शाळा, महाविद्यालये, दवाखाना अशा ठिकाणी सांगून चालत नाही. विविध दाखल्यांसाठी नागरिकांना पूर्णवेळ तलाठी असणे फार गरजेचे आहे. – आशिष माने, अध्यक्ष,
वडगावशेरी नागरिक मंच