पुणे – राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा पुणे शहरात कॉंग्रेस पक्षाचे पालकत्व कोणाकडे याचे उत्तर अजूनही पक्षाच्या नेत्यांना मिळालेले नाही.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्यासाठी “दादा’ उपलब्ध असतात. कार्यकर्ते हक्काने त्यांच्याकडे जातात. आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होते. ते एकदम अजित पवारांकडे जाऊ शकत नाहीत, तशी त्यांची मानसिकताही नाही. ही कोंडी लक्षात घेऊन पुण्याचे संपर्कमंत्री म्हणून शिवसेनेने परिवहनमंत्री अनिल परब यांची गेल्या महिन्यात नियुक्ती केली. कॉंग्रेस पक्षात मात्र पालकत्व कोणाकडे द्यायचे, याचा निर्णयच होईना त्यामुळे अद्याप संपर्कमंत्री नेमलेलेच नाहीत, असे समजले.
कॉंग्रेसच्या वतीने सुनील केदार यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे, असे समजले. पण, केदार कधी पुण्यात आले नाहीत आणि त्यांच्या नियुक्तीचा अधिकृत खुलासा कॉंग्रेसकडून कधी झाला नाही. राज्यमंत्री विश्वजीत कदम हे संपर्कमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे समजले. पण, तूर्त तरी शासन आणि पक्ष कार्यकर्ते यांच्यात दुवा साधणारा नेता नाही, अशी स्थिती आहे. कॉंग्रेस पक्षात सध्या निर्णायकी अवस्था आहे.
करोनाची पहिली लाट पुण्यात खूप मोठी आली. त्या काळात कॉंग्रेस पक्षाचे एकही मंत्री पुण्यात आले नाहीत. याबद्दल पुण्यातील बैठकांमध्ये चर्चा होत असते. राज्यातील कॉंग्रेसचे मंत्री दर पंधरा दिवसांनी पुण्याला भेट देणार असा एक कार्यक्रम जाहीर झाला होता. पण, तसेही काही झाले नाही. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना शासनाशी दुवा साधणारा कोणी पालक मिळेल का? अशी चर्चा होत असते.
मंत्री पुण्यासाठी वेळ देतील का?
कॉंग्रेस पक्षाची स्थिती पुण्यात भक्कम नाही. पक्षाचे नगरसेवक 9 आहेत आणि शरद रणपिसे एकमेव विधान परिषद सदस्य आहेत. अशा वेळी राज्यातील मंत्र्यांनी पुण्यातील पक्ष संघटनेसाठी वेळ देण्याची गरज आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार यंत्रणा व्यवस्थेसाठी मंत्री सतेज पाटील पुण्यात येऊन गेले, राज्यमंत्री कदम यांनी काही व्यवस्था पाहिली. वर्ष सव्वा वर्षांनी महापालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे, त्याची तयारी पक्ष कधी करणार? असा प्रश्न निर्माण होतो.