पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील रुग्णांना करोनाची भीती वाटत नाही. कारण येथील डॉक्टर रुग्णांवर चांगले उपचार करत आहेत. करोनामधून डॉक्टर वाचवतील मात्र उपाशीपोटी मरण आले तर काय असा प्रश्न रुग्णांपुढे पडला आहे. महापालिका रुग्णांना जेवणही पुरवू शकत नसल्याने महापालिकेची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे.
वायसीएममध्ये रुग्णांना जेवण, नाश्ता, चहा देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. कंत्राटानुसार सकाळचा नाश्ता साडेआठ वाजता देणे आवश्यक आहे. मात्र हा नाश्ता अकरा वाजता दिला जातो. दुपारचे जेवण चार वाजता मिळते. तर रात्रीचे जेवण रात्री अकरा वाजल्यानंतर येते. त्यामुळे रुग्णांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही जेवणासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जेवण उशिरा येऊनही चांगल्या प्रतीचे नसते. नाश्तासाठी अवघे 40 ग्रॅम पोहे दिले जातात. दुपारच्या जेवणात दोन पातळ पोळ्या व डाळ भात दिला जातो. हे जेवण पुरत नसल्याने रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महापालिकेने हे काम थेट पद्धतीने एका कॅन्टिन चालकाला दिले होते. त्यासाठी प्रतिव्यक्ती 250 रुपये दर होता. त्या वेळीही हीच परिसस्थिती होती. अनेकवेळा कोविड केअर सेंटरमध्ये जेवण वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ई टेंडरिंगच्या माध्यमातून पहिल्या पाच ठेकेदारांना हे काम देण्यात आले. त्यासाठी प्रतिव्यक्ती 180 रुपये दर ठरविण्यात आला. यामध्ये दोन वेळचे जेवण, चहा, नाश्ता व तीन पाण्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. मात्र रुग्णांना वेळेत जेवण पुरविले जात नाही. तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण असून ते ही कमी प्रमाणात असते. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही हेच जेवण दिले जाते. मात्र त्यांनाही वेळेत जेवण मिळत नाही. महापालिकेच्या या प्रकारामुळे रुग्णांवर पाणी पिऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे.
भांडार विभागाचे वैद्यकीय विभागावर खापर
भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, बचतगटांच्या माध्यमातून रुग्णांना जेवण पुरविले जात आहे. रुग्णांच्या जेवणाची वेळ, नाश्ताची वेळ समजण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. जेवण किती द्यायचे याबाबत वैद्यकीय विभागाने सुचविले होते. वैद्यकीय विभागाने जर जास्त जेवणाची मागणी केली असती तर जास्त जेवण देण्याची अट निविदेमध्ये टाकली असती. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने सुचविले तसे जेवण संस्था पुरवित आहे.
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
महापालिका रुग्णालयातील रुग्णांना वेळेत जेवण मिळत नाही. तसेच निकृष्ट प्रतीचे जेवण दिले जाते. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. निविदा काढून ठेकेदाराला काम दिले. परंतु ते काम ठेकेदार व्यवस्थित करत आहे की नाही याची पाहणी प्रशासन करत नाही. निविदा काढायची, त्यातून येणारी मलाई खिशात घालायची एवढाच कारभार महापालिकेत सुरू आहे. रुग्णांची एवढी हेळसांड होत असताना सत्ताधारी व विरोधक मात्र दोघेही मूग गिळून गप्प आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ही अडचण आली आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत जेवण चांगले व पुरेसे आले नाही तर त्यासंदर्भात लेखी कळवू.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम.