पुणे – करोनाच्या संकटामध्ये ससून रुग्णालयातील काही डॉक्टर त्यांच्या मागण्यांसाठी संप करू असे म्हणत आहे. ही वेळ संपाची नसून, डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अन्यथा राज्य सरकारलाही ठोस निर्णय घ्यावा लागेल. सध्या, या साथीवर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र लढावे, असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ससून आणि जम्बो कोवीड रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. मात्र, ससून रुग्णालयातील काही डॉक्टर संपाच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता, हे योग्य नाही. त्याबाबत येत्या सोमवारी (दि. 19) बैठक आयोजीत केली आहे. त्यामध्ये डॉक्टरांच्या रास्त मागण्या असतील, तर त्या नक्कीच मान्य करण्यात येतील. मात्र, जास्त टोकाच्या मागण्या असतील, तर राज्य सरकारलाही ठाम निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे. सध्या, आपण सगळेच अडचणीत आहोत. त्यामुळे डॉक्टरांनी सामज्यस्याची भूमिका घेऊन काम करावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी डॉक्टरांना केले.
यंत्रणा उत्तम काम करीत आहे…
करोनामध्ये प्रशासकीय यंत्रणा उन्मळून पडली का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारताच, यंत्रणा ही उत्तम पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे उन्मळून पडली असे म्हणून त्यांना ना उमेद करू नका. मागील वर्षभर ही यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. त्यांचा अनुभव वाढलेला आहे. डॉक्टर, पोलीस वर्षभर राबत असून, त्यांची यंत्रणाही चांगली आहे. सध्या, जिल्हा परिषदेने 900 पेक्षा अधिक डॉक्टर आणि कर्मचारी भरती केली आहे. त्यामध्ये केवळ एमबीबीएस डॉक्टर जेवढे मिळणे अपेक्षीत आहे, तेवडे मिळत नाही.