कर्जत – कर्णबधीर मुलाच्या आजारपणाला कंटाळून पत्नीसह दोन मुलांना इंजेक्शनद्वारे विषारी औषध देत त्यांना संपवून राशीन (ता. कर्जत) येथे प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही मनाला हादरा देणारी घटना घडली. एकाचवेळी चौघांचे जीवन संपल्याने कर्जत हादरले असून, त्यांच्याविषयी सर्वांनीच हळहळही व्यक्त केली आहे.
कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून घरातील सर्वांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. तथापि, हा घातपाताचा प्रकारही असू शकतो. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, लिहिलेल्या चिठ्ठीत आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणार्या एखाद्या संस्थेला दान द्यावी, अशीही इच्छा डॉ. थोरात यांनी चिठ्ठीतून व्यक्त केलेली आहे.
राशीनमध्ये डॉ. थोरात यांचे हॉस्पिटल आहे. त्यांचे कुटुंबीय आज घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ. महेंद्र यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा (वय 39) मोठा मुलगा कृष्णा (वय 16) व लहान मुलगा कैवल्य (वय 7) हे मृतावस्थेत आढळून आले. तिथेच लिहिलेल्या चिठ्ठीतून वरील घटनाक्रम तपासात समोर आला आहे. चिठ्ठीत उल्लेख केल्याप्रमाणे अगोदर पत्नी व मुलांना डॉक्टर महेंद्र यांनी विषारी औषधाचे इंजेक्शन दिले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेंद्र यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांना थोरात यांच्या घरातच ही सुसाईड नोट मिळाली. मोठा मुलगा कृष्णा याच्या कर्णबधीर व्यंगाला कंटाळून हा प्रकार घडल्याचे त्यातून प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चिठ्ठीत म्हटले आहे की, ‘आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने राहणे आता आम्हाला सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत.
कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र, तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे दु:ख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला माफ करा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.
कृष्णा होता क्रिकेट खेळाडू..!
कर्णबधीरपणाचे व्यंग असुनही कृष्णा क्रिकेट खेळाडू होता. त्याला चांगले करिअर करता यावे, यासाठी त्यास पुण्यातील एका क्रीडा संस्थेत पाठविण्यात आले होते. त्याला ऐकू यावे, त्याला श्रवणयंत्रही घेऊन देण्यात आले होते. तथापि, त्याचा उपयोग होत नव्हता. त्यातून नैराश्य वाढल्याचे दिसत आहे. डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत.