सविंदणे – शेतकरी अनेकदा वारंवार हेलपाटे मारत असून तहसीलदार त्यावर दुसरे तहसीलदार आल्यावर काम करुन घ्या, असा अजब सल्ला देत आहे. तहसिलदार हया शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देत असून योग्य ती कार्यवाही करत नसल्याचे शेतकरी बाबूराव चव्हाण व दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले आहे.
शिरूर तहसिलदार कार्यालयात गेले सहा महिन्यांपासून प्रभारी तहसीलदार म्हणून रंजना उंबरहांडे ह्या काम पाहत आहेत. या कार्यालयात अर्जदार बाबूराव शंकर चव्हाण (रा. निमगाव म्हाळुंगी) यांनी विठ्ठलवाडी येथील जमिन गट नं. 271 मध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ता मिळणेकामी प्रांत आधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केले आहे.
हे प्रकरण तीन महिन्यांपूर्वी पुनर्विलोकनासाठी शिरूर तहसीलदार यांच्याकडे पाठवले होते. मात्र अद्याप तहसिलदारांकडून साधी नोटीसही काढली नाही. तसेच कलम155 अंतर्गत जमिन गट नं 271मधील पोकळीस्त शेरा कमी करणे कामी दि.16 ऑक्टोबर 2021 रोजी अर्ज केला होता. अद्यापपर्यंत ते काम झालेले नाही.
असाच प्रकार संपत दत्तात्रय चव्हाण यांच्या बाबतीत घडला असून 22 नोव्हेंबर 2021 रोजी उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्तीसाठी 155 कलम अंतर्गत दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. अद्यापपर्यंत दुरुस्ती झाली नाही. गेले अनेक महिन्यापासून पुनर्वसनच्या, कलम -155 अंतर्गत चुक दुरुस्तीच्या, तसेच रस्त्याच्या केसेस अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचे शेतकरी सांगत आहे.