पुणे – रक्तदाबाची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. विशेषत: तरुणांमध्येही हि समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे तणाव आणि चुकीची जीवनशैली. मात्र, काही लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अनुवांशिकही असते. अशा परिस्थितीत आरोग्याची पूर्ण काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा कडक ऊन असते तेव्हा स्वत:ला हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. पाण्याबरोबरच आरोग्यदायी पेयांचाही आहारात समावेश करणे गरजेचा असतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात उच्च रक्तदाब वाढण्यापासून रोखायचा असेल तर हे ‘4 ‘ आरोग्यदायी पेये पिऊ शकता.
१) नारळ पाणी –
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी नारळ पाणी एक वरदान आहे. नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात. यासह, मूत्रपिंडातून अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यास मदत करते. तसेच त्यात पोटॅशियम असते. जे सोडियमची पातळी योग्य ठेवण्यास मदत करते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असेल तर नारळपाणी प्यायल्याने ते नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबही सामान्य राहतो.
२) ताक –
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ताक अतिशय फायदेशीर आहे. उन्हाळ्यातील हे सर्वोत्तम देसी थंड पेय आहे. जर तुम्हाला वाढलेल्या वजनाने उच्च रक्तदाबाच्या समस्येने घेरले असेल तर ताक प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
३) टोमॅटोचा रस –
उच्च रक्तदाबाचे रुग्ण टोमॅटोचा रस पिऊ शकतात. मात्र, चव वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मीठ घालण्याची चूक करू नका. फक्त टोमॅटोचा रस प्यायल्याने रक्तदाबाची पातळी सुधारण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉलही कमी होते.
४) फॅट दुधाशिवाय केळी शेक –
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी केळी जरूर खावी. उन्हाळ्यात फॅटशिवाय स्किम्ड मिल्कमध्ये बनवलेला केळीचा शेक प्यावा. यामुळे तुमचे शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि बीपी जास्त होणार नाही.