कोल्हापूर, – मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्य सरकारने केलेल्या दिरंगाईबद्दल राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जहरी टीका केली आहे.
अशोक चव्हाण यांना भीक मागून मिळेल असे खाते मिळाले आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर कोतवालाचे तलाठी झालेले आम्ही बघितले आहेत. मात्र, तालाठ्याचा कोतवाल झालेला पाहिला नाही. कोतवालदेखील तुमच्यापेक्षा स्वाभिमानी असतो, अशा शब्दांत सदाभाऊंनी अशोक चव्हाण यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. सदाभाऊ खोत कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
ओबीसींना ज्या पद्धतीने सवलती मिळत आहे. त्याच पद्धतीने मराठ्यांना तत्काळ सवलती देणे सुरू करावे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे राज्यपालांची भेट घेतात, म्हणजे यांना देवाच्या आळंदीला जायचे नाही तर चोराच्या आळंदीला निघाले आहेत. म्हणून त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. म्हणूनच अशोक चव्हाण तुम्ही मराठा आरक्षणाबाबत एक प्रोग्राम ठरवा जर तुम्ही हे ठरवले नाही तर जसा पायउतार आदर्श मुख्यमंत्री म्हणून झाला. तसेच तुम्ही मराठा समाजाचे आदर्श नाकर्ते राज्यकर्ते म्हणून पायउतार व्हावे लागेल. आता ट्विट वगैरे सगळं बंद करा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, हे कपाळकरंटे पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. अशी जळजळीत टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. अशोक चव्हाण तुम्ही फार हुशार आहात. तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा. वेड्याच्या दवाखान्यात जाण्याची अवस्था तुमची झाली आहे. दोन वर्ष अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होता का? असा सवाल राज्य सरकारला सदाभाऊ खोत यांनी केला.
सारथी सारखी संस्था या सरकारने बंद पाडली. ज्यावेळी तुम्ही केंद्रात सत्तेत होता आणि राज्यातही सत्तेत होता. त्यावेळी तुमचे हातपाय कोणी बांधले होते? असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी केला.
अशोकराव चव्हाण यांची अवस्था, पिंजऱ्यातील पोपटासारखी आहे. प्रस्थापित मराठा समाजाला आरक्षण नको आहे. विस्थापित मराठ्यांना आरक्षण देण्याची प्रस्थापित मराठ्यांची भूमिका नसल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार कोर्टात गेले. मात्र, राज्य सरकार पुन्हा कोर्टात का गेले नाही, असा सवाल खोत यांनी केला.