मुंबई: राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कर्जाच्या हप्त्याची वसूली करू नका. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे तातडीने सुरू कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज “वर्षा’ निवासस्थानी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “ऑडीओ ब्रीज सिस्टम’द्वारे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 35 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.
मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रीत सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 8 तालुक्यातील 930 गावातील 4 लाख 80 हजार 589 शेतकऱ्यांना 249.47 कोटी रूपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 28 हजार 893 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 14.80 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी 5 कोटी इतकी रक्कम 11 हाजर 880 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 5.20 लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 1.06 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रूपयाप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 21.34 कोटी इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.