नवी दिल्ली – हे सरकार लाखो कोटींचे श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकते मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करू शकत नाही? असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारला आहे. वायनाडमध्ये कर्जबाजारी 8000 शेतकऱ्यांना बॅंकांनी नोटीस बजावली असून त्यांची संपत्ती जप्त केली जात आहे. त्यातच वायनाड येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. याच विषयाला हाताशी धरुन शून्यप्रहरादरम्यान राहुल गांधींनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने गेल्या पाच वर्षांत श्रीमंतांचे 5.5 लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण त्याचवेळी शेतकऱ्यांचे कर्ज मात्र सरकार माफ करत नाही. असे म्हणत त्यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर टिकास्त्र सोडले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेला कॉंग्रेस सरकाराची धोरण जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या दुर्दशेला भाजपची पाच वर्षं नाही तर कॉंग्रेसची सत्तर वर्षांची धोरण जबाबदार आहेत असा टोलाही त्यांनी लगावत कॉंग्रेस काळात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.