मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. त्यावर आता शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात आता नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला सिंहाच्या गुहेत येण्याची हिंमत करु नका अशा शब्दांमध्ये आव्हान दिलं आहे.
काय आहे नितेश राणे यांचे ट्विट
‘शिवसेनेच्या युवा सेनेने कार्यकर्त्यांना आमच्या मुंबईतील जुहूतील घराबाहेर गोळा होण्यास सांगितलं आहे. आमच्या घराजवळ जर का कोणीही जमा झाले तर त्यांना रोखण्याचे काम मुंबई पोलिसांनी करावे असे न झाल्यास जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल. सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत.